गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांची मागणी
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी येथील धरणाचे महाराणी लक्ष्मीबाई तलाव असा नामविस्तार करावा अशी मागणी गोकुळ चे नूतन संचालक व राजर्षी शाहू स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
अखंड महाराष्ट्राला जलसिंचनाची दूरदृष्टी देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कल्पकतेतून आणि सर्वसामान्य जनतेच्या पिण्यासाठी व शेतीसाठी राधानगरी येथे संस्थान काळात त्यांच्या पत्नी श्रीमंत महाराणी लक्ष्मीबाई यांच्या नावे धरणाची ची निर्मिती केली. कोल्हापूरच्या हरित क्रांतीचा पाया या धरणाच्या माध्यमातून घातला गेला. महाराणी लक्ष्मीबाईंच्या नावाने असलेल्या या धरणाच्या नामफलकावर व विविध पुस्तकात, शासन दरबारी पण या धरणाचा उल्लेख लक्ष्मी तलाव असा आहे.
त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना,अभ्यासकांना पण या धरणाचा इतिहास समजत नाही तरी त्वरित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी लक्ष देऊन महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे उल्लेख सर्वत्र करावा तसेच लवकरात लवकर धरणस्थळावर महाराणी लक्ष्मीबाई तलाव राधानगरी असा फलक लावून आम्हा सर्व शाहू प्रेमींची मागणी पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.