राधानगरी/प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापासून राधानगरीसह बनाचीवाडी गावात बुधवारी रात्री उशिरा बिबट्याचा वावर दिसत असून पाळीव व भटक्या कुत्र्यांना हल्ला करून ठार मारले आहे. हा बिबट्या प्रत्यक्षात कोणाला दिसला नसला तरी त्याचे पायाचे ठसे शेतात दिसून येत आहेत.
गेल्या महिन्यात पिरळ गावात शेतात काम करणाऱ्या महिलांना बिबट्या दिसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले होते, तसेच मागील आठवड्यात न्यू करंजे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना राधानगरी परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे दिसल्याने व भटक्या कुत्र्यावर हल्ला होत असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात शेताकडे जाताना, जनावरे चारायला नेताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच रात्री अपरात्री एकटे फिरू नये. संबधीत बिबट्या दिसल्यास स्थानिक जाणकार मंडळी, निसर्ग मित्र संस्थांना बिबट्याचा नागरी वस्तीत अधिवास या बाबतीत सूचना देऊन जागृत करणे आवश्यक आहे, तसेच बिबट्या दिसल्यास वन्यजीव विभागास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.