प्रतिनिधी / सांगली
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभागाने आयोजीत केलेला रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.
जिल्हा कृषी कार्यालय व प्रकल्प संचालक (आत्मा) सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विजयनगर मधील आत्मा सभागृह येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या रानभाज्या महोत्सवाचे उद्धाटन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी उपसंचालक प्रभाकर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.