नियमांचे पालन केल्यास रापण व्यवसाय वाचेल
रापणीचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी पर्यटनाची जोड आवश्यक
राजेंद्र मुंबरकर / देवगड:
रापण हा मासेमारीचा कोकणातील पारंपरिक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. भातशेती व अन्य शेतीच्या हंगामानंतर आर्थिक स्थैर्य निर्माण करणारा सामुहायिक उत्पन्नाचे साधन म्हणून रापण या व्यवसायाकडे पाहिले जात असे. कोकणातील संस्कृतीमधील एक महत्वाचा असा ठेवा रापण आज अनेक संकटामुळे धोक्यात आला आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीने जगण्याची आदर्श संस्कृती आज लोप पावत चालली आहे. नव्या पिढीला या संस्कृतीची माहिती होण्यासाठी रापणीला पर्यटनाची जोड द्यायला हवी.
कोकण म्हटले की आठवतो तो सुंदर असा नयनरम्य सागरी किनारा. या समुद्रात मासेमारीसाठी जाणे हा एक वेगळाच आनंद असतो. यामध्ये रापण हा मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय पाहणे व त्यात सहभाग घेणे याही एक विलक्षण असा आनंद अनुभवता येतो. अशा या रापण व्यवसायाला आज आधुनिक मासेमारीने मेटाकुटीस आणले आहे. रापण याच पद्धतीचा आधुनिक तंत्रज्ञानात बदल करत पर्ससियन नेटच्या माध्यमातून बेसुमार मासेमारी केली जात आहे. रापण या तंत्राचा अवलंब या आधुनिक मासेमारीमध्ये केल्याचे दिसत आहे.
मिनी पर्सनेटमुळे रापण व्यवसायाला उतरती कळा
रापण हा व्यवसाय किनाऱयापासून समुद्रात खोल अंतरावर जाळे टाकून केला जात असे. परराज्यातील मोठय़ा पर्ससियन नौकांनी अति खोल समुद्रातील मासेमारी बेसुमार करण्यास सुरुवात केल्यानंतर छोटय़ा यांत्रिकी नौकांना मासे मिळणे मुश्किल बनले. अशावेळी स्थानिक मच्छीमारांनी मिनी पर्सनेट नौका आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या व्यवसायासाठी आणल्या. विशेषतः रापण व्यवसाय अगदी कमी पाण्याच्या पातळीपासून ते काही अंतरावर गेल्यानंतर खोल पाण्यातही करण्यासारखा आहे. माशांचे थवे ग्रामीण भाषेत त्याला खांडाव असे म्हणतात. ही खांडावे किनाऱयाकडे जास्तीत जास्त येत असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर हा काळ समुहाने मासे किनारी भागात येण्याचा असतो. अशावेळी मिनी पर्सनेटवाले रापण क्षेत्रात येत बेसुमार मासेमारी करतात. परिणामी रापण या व्यवसायाला मासे मिळणे मुश्किल बनले आहे.
जिल्हय़ात सुमारे 96 रापण संघ कार्यरत केवळ 40
सिंधदुर्ग जिल्हय़ात वेंगुर्ले ते विजयदुर्ग या किनारी भागात सुमारे 96 रापण संघ कार्यरत होते. आज रापणीवर आधुनिक मासेमारीमुळे उतरती कळा येत हे संघ केवळ 40 कार्यरत असल्याचे दिसत आहेत. वीस वर्षापूर्वी पाहिले तर रापणीला सुरुवातीलाच कोळंबी हा मासा पैसा प्राप्त करून देणारा मिळत होता. कोळंबी रेडी समुद्रातून थेट देवगडला येण्याचा मार्गक्रम हा जुलै ते सप्टेंबर असा होता. अगदी कुणकेश्वरच्या समुद्रात मोठय़ा प्रमाणात कोळंबी मिळत असे. त्यानंतर पापलेट हा मासा मिळत असे. खवळे मासे समुद्रात उडायला लागले की रापणीतील सहभागी लोक आनंदी होत असत. कारण पैसा प्राप्त करून देणारा पापलेट हा मासा मिळणार असे. त्यानंतर म्हाकुलवर तर रापण हा व्यवसाय मोठा होत आला होता. तारली ही मासळीही उत्पन्न देणारी अशी होती. परंतु वाढत्या ट्रार्लसमुळे ही मासळी आता किनाऱयावर येऊच देत नाहीत. त्यामुळे व्यवसाय डबघाईला आला आहे.
नियमांचे पालन करीत मासेमारी व्हावी
रापण क्षेत्रात नियमांचे पालन न करता ट्रार्लसचे अतिक्रमण हे गेल्या दोन वर्षात मोठय़ाप्रमाणात वाढीस लागले आहे. रापण हा व्यवसाय पुन्हा उभा करायचा असेल तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन हे प्रत्येक व्यावसायिकांनी केले पाहिजे. रापण या व्यवसायावर सुमारे 40 ते 50 कुटुंबे उदरनिर्वाह करीत असतात. आज शेती व्यवसायही बदलत्या हवामानामुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या प्रकाशझोतात होत असणारी मासेमारी थांबली पाहीजे. प्रजनन काळातच राक्षसी पद्धतीने खोल समुद्रात मासेमारी केली जाते. छोटे मासे जाळय़ात येतात. त्यांनाही सोडले जात नाही. छोटे मासेही कारखान्यामध्ये प्रक्रीयेसाठी पाठविले जातात. या उत्पादनासाठीही छोटे मासेही बळी पडत आहेत.
रापण पर्यटकांना आकर्षण ठरणार
बदलत्या काळात रापण हा व्यवसाय लोप पावणार असे दिसत आहे. अशावेळी नव्या पिढीला रापण म्हणजे काय हे पाहण्यासाठी आता किनारी भागात रापणीबाबतचे प्रदर्शन निर्माण झाले पाहिजे. रापण या व्यवसायाचा इतिहास जपण्यासाठी आता मच्छीमारांनी योग्य विचार केला पाहिजे. किनाऱयावर असणाऱया होडय़ा पर्यटकांना सफर करण्यासाठी उपयोगात आणले पाहिजे. तसेच रापण या व्यवसायासाठी असणाऱया साहित्याची ओळख पर्यटकांना व्हावी, यासाठी संग्रहालये निर्माण व्हावीत. ज्यामुळे पर्यटकांच्या माध्यमातून रापण व्यावसायिकांना आर्थिक प्राप्ती करता येईल.
रापण संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा-महेंद्र पराडकर
मालवण येथील मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी रापण हा व्यवसाय टिकवायचा असेल तर शासनाने दिलेल्या नियमांचे योग्य पालन केले पाहीजे. रापण हा येथील संस्कृतीचा भाग आहे. ही संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घ्यायला हवा. पर्यटकांनाही रापण हा व्यवसाय समजण्यासाठी आपण वेगळा विचार केला पाहिजे. हातावर पोट असणाऱया मच्छीमारांना शासनाकडून 10 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. यामध्ये रापण व्यवसायातील सदस्यांचाही समावेश आहे. ही बाब दिलासा देणारी आहे. मच्छीमारांनी मच्छीमार संस्थांशी संपर्क साधून अनुदान मिळावावे, असे आवाहनही त्यांनी केले.