ऑनलाईन टीम / अंबाला :
भारत आणि चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना आज पाच राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात औपचारिकरित्या समावेश झाला. या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राफेलचे हवाई दलात समावेश होणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या आनंदाच्या क्षणी मी इंडियन एअर फॉर्स मधल्या सर्व सहकाऱ्यांचे आणि देशवासीयांचे अभिनंदन करतो.
इंडियन एअर फोर्समध्ये राफेल फायटर विमानांचा समावेश हा संपूर्ण जगासाठी आणि खासकरुन आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा आणि कठोर संदेश आहे, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी नाव न घेता चीन ला दिला आहे.
पुढे ते म्हणाले, सध्या आमच्या सीमेवर जी स्थिती आहे, किंवा जी स्थिती निर्माण केली गेली आहे, अशा वेळी राफेलचा इंडियन एअर फोर्स मध्ये समावेश होणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात मी भारताचा दृष्टीकोन जगासमोर ठेवला. त्यावेळी कुठल्याही परिस्थितीत आम्ही सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी अजिबात तडजोड करणार नाही. भारताचा हा निर्धार असून, त्याची मी कल्पना दिली आहे. सार्वभौमत्वासाठी शक्य ते सर्व करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.