यज्ञसंभवा सीता ही राजा जनकासाठी ‘वीर्यशुल्का’ होती. ती जसजशी मोठी होऊ लागली तसतसे देशोदेशीचे राजे तिला मागणी घालू लागले. तरी जनकाने तिला कोणालाही ‘वीर्यशुल्का’ म्हणून दिली नाही. त्यांच्यासमोर त्यांचे सामर्थ्य पाहण्यासाठी ते त्र्यंबकचाप (शिवधनुष्य) आणून ठेवले असता एकालाही ते उचलता आले नाही. अनेकांना नकार दिल्यामुळे अपमानित झालेल्या त्या राजांनी प्रुद्ध होऊन मिथिलानगरीला सैन्याने वेढून टाकले. तेही एक वर्षापर्यंत! जनकाकडची साधनसामग्री संपत आली. तेव्हा त्याने देवांची करुणा भाकली. तपश्चर्या केली. तेव्हा त्याच्यावर प्रसन्न होऊन देवांनी आपले चतुरंग सैन्य त्याच्या सहाय्याला दिले. राजाचे सामर्थ्य पाहून सारे राजे आपापल्या अमात्यांसह वाट फुटेल तिकडे पळून गेले. ‘असे हे शिवधनुष्य मी रामलक्ष्मणांनाही दाखवीन.’ असे सांगून राजा जनकाने मनात शिवधनुष्याबद्दल असलेला ‘पण’ प्रथमच महषी विश्वामित्रांना सांगितला.
यद्यस्य धनुषो रामः कुर्यादरोपणं मुने। सुतामयोनिजां सीतां दद्यां दाशरथेरहम्….‘हे मुने, राम जर हे धनुष्य उचलून सज्ज करील, तर अयोनिसंभवा सीता मी दशरथपुत्र रामाला देईन’ तर हे शिवधनुष्य राजा जनकाकडे पिढीजात ठेव म्हणून आले होते. म्हणजेच राजाने सीतेचे स्वयंवर कधीच मांडले नव्हते. ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न पूर्वी अनेक देव, गंधर्व, राजे इ. नी केला होता. पण कोणीच त्यात यशस्वी झाले नव्हते. परंतु विश्वामित्रांबरोबर रामलक्ष्मण मिथिलानगरीकडे आले असता त्यांनी ते धनुष्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याची कथा राजाकडून त्यांना कळली. सीतेचीही जन्मकथा कळली आणि फक्त त्यांच्यासमोरच प्रथम राजाने आपला ‘पण’ जाहीर केला. तो सीतेचा ‘पण’ नव्हता. त्यामुळे सीतेचे स्वयंवर घडलेच नव्हते. तर रामाने सहजपणे राजाच्या पणानुसार स्वसामर्थ्याने धनुष्य उचलून ते चक्क मोडलेच होते. या पराक्रमावर खुश होऊनच जनकाने आपली कन्या सीता रामाला दिली, असे मूळ वाल्मीकी रामायणात वर्णन आहे. बाकीच्या दंतकथा आहेत!
आजपर्यंत आपण कीर्तन प्रवचनातून सीता स्वयंवराच्या गोष्टी ऐकून ती रामायणातीलच कथा आहे, असे आपल्याला वाटते. अर्थात रामायणावर आधारित अनेक पुराणे, काव्ये रचली गेली. त्यात त्या त्या लेखक-कवींनी स्वतःची भर टाकली. त्यातल्या काही कथा रामायणकथा म्हणून रूढ झाल्या. पण खरी कथा मात्र वेगळीच आहे!