गुप्तचर विभागाच्या इशाऱयानंतर अयोध्येत अलर्ट
वृत्तसंस्था / अयोध्या
अत्यंत संवेदनशील मानल्या जाणारी अयोध्येची रामनगरी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. देशाच्या गुप्तचर यंत्रणांकडून दहशतवादी हल्ल्याचे इनपूट देण्यात आल्यावर रामनगरीत अलर्ट घोषित करण्यात आला आहे. वादग्रस्त बाबरी ढांचा पतनाला 6 डिसेंबर रोजी 29 वर्षे पूर्ण होणार असल्याने हा इशारा महत्त्वाचा आहे. या इनपुटनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली रामजन्मभूमीसह पूर्ण अयोध्येत एटीएस तसेच पोलीस दलाने पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.
रामनगरी अयोध्येत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. डायल 112 वर अज्ञाताकडून मिळालेल्या या धमकीनंतर अयोध्येतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. फोनवरून धमकी देणारा व्यक्ती अहमदाबाद येथील असल्याचे समजते. या धमकीनंतर अयोध्येतील प्रत्येक प्रवेशद्वार तसेच धर्मशाळांमधील सुरक्षा वाढविण्यात आली. सर्वप्रथम रामजन्मभूमीच्या सुरक्षेकरता तैनात जवानांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली. एटीएसच्या पथकाने हनुमानगढीसह रामकोट क्षेत्रात आढावा घेत लोकांना सुरक्षेबद्दल आश्वस्त केले आहे.
सुरक्षेत वाढ
सोशल मीडियाद्वारे दहशतवाद्यांकडून मिळालेली धमकी आणि 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. प्रवेशमार्गांवर विशेष दक्षता बाळगली जात आहे. कुठलीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तूची माहिती मिळाल्यावर त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 3 डिसेंबरपासून अयोध्येत रामविवाह उत्सव देखील सुरू होत असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी सतर्कता वाढविली आहे.
निवडणूक तोंडावर
उत्तरप्रदेशची विधानसभा निवडणूक नजीक आली आहे. या निवडणुकीत अयोध्येत उभारले जाणारे भगवान श्रीरामांचे मंदिर महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. अशा स्थितीत अयोध्येत अनेक राजकीय नेत्यांचे दौरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्याने सुरक्षा दलांना विशेष दक्षता घ्यावी लागतेय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांपूर्वीच अयोध्येत होते. आगामी काळात आणखी अनेक मोठे नेते अयोध्येत दाखल होऊ शकतात. अशा स्थितीत रामनगरीत मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.