साडेचार एकर जागेतील उद्यान झाले बकाल : खेळाचे साहित्य मोडकळीस : वॉकिंग ट्रकची दुरवस्था : विकास करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
रामतीर्थनगर परिसरातील स्वच्छता, पथदिपाची देखभाल आणि उद्यानाच्या विकासाकडे बुडाने कानाडोळा केला आहे. रामतीर्थनगरमधील उद्यानामध्ये झाडेझुडपे वाढली आहेत. येथील उद्यानाला जंगलाचे स्वरूप आले असून गवताने भरलेल्या उद्यानामध्ये खेळण्याची वेळ मुलांवर आली आहे. त्यामुळे स्मार्टसिटी बनविण्यात येत असलेल्या भागातील उद्यान विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
ही वसाहत बुडाने 1993 ला निर्माण केली आहे, पण अद्याप महापालिकेकडे हस्तांतर केली नाही. पण रहिवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यातदेखील बुडा अपयशी ठरली आहे. सदर वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. पण परिसरातील समस्यांचे निवारण करण्याकरिता 100 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. यामुळे सदर वसाहत हस्तांतर करून घेण्यास महापालिकेने नकार दिला आहे. यामुळे हस्तांतर तिढा जैसे थे आहे. पण मागील वषीपासून महत्त्वाची विकासकामे राबवून नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यात आले. तसेच गटार बांधकाम आणि अन्य विकासकामे राबविण्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण यामध्ये उद्यानाच्या विकासाची तरतूद करण्यात आली आहे का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उद्यानामध्ये झाडे-झुडपे वाढली
शहराचा विकास करण्याची जबाबदारी बुडाची आहे. पण विकसित केलेल्या वसाहतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने उद्यानामध्ये साप-किडय़ांचा वावर वाढला आहे. याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य बसविण्यात आले आहे. पण गवत, झाडे-झुडपे वाढली असल्याने यामध्ये खेळाचे साहित्य गायब झाले आहे. तसेच असलेले खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. रामतीर्थ नगरमध्ये एकमेव असलेल्या उद्यानामध्ये झाडे-झुडपे वाढली असल्याने सापा-किडय़ांचे वास्तव्य वाढले आहे. समस्येच्या भोवऱयात सापडलेल्या उद्यानामध्ये लहान मुले कशी खेळणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
येथील उद्यानामध्ये वृद्धांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रक निर्माण करण्यात आले होते. पण हे वॉकिंग ट्रक गवतामध्ये हरवले असून पेव्हर्स उखडले आहेत. यामुळे पादचाऱयांना वॉकिंग करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच वृद्ध नागरिक पेव्हर्सवरून चालताना अडकून पडत असल्याची तक्रार होत आहे. यामुळे उद्यान असून नसल्याप्रमाणे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. येथील समस्यांची पाहणी करून उद्यानाचा विकास करण्याची मागणी होत आहे.