खानापूर न्यायालयात लावली उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम हे सोमवारी खानापूर न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी जामीन घेतला आहे. खानापूर येथे म. ए. समितीच्यावतीने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषण केले म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
खानापूर येथे 26 ऑक्टोबर 2006 रोजी म. ए. समितीचा महामेळावा भरविण्यात आला होता. या महामेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी प्रक्षोभक भाषण केले म्हणून 27 ऑक्टोबर 2006 रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रामदास कदम यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वाय. डी. अक्षीमनी यांनी गुन्हा दाखल केला होता. या मेळाव्याला साताऱयाचे नितीन पाटील हे देखील उपस्थित होते.
या मेळाव्यानंतर मराठी तरुणांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत तोडफोड केली होती. याप्रकरणी खानापूर पोलीस स्थानकामध्ये प्रक्षोभक भाषण केले म्हणून रामदास कदम यांच्या विरोधात 153, 153 (ए) अन्वये गुन्हा दाखल केला होता. 3 मार्च 2008 रोजी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. तरी देखील ते हजर झाले नाहीत. यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने बजावले होते. रामदास कदम यांनी 1 एप्रिल 2022 रोजी अटकपूर्व जामीन घेतला होता.
न्यायालयाने त्यावेळी स्वतः हजर राहून जामीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रामदास कदम हे सोमवारी सकाळी खानापूर येथील अकरावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात हजर झाले. त्या ठिकाणी न्यायालयाने 5 लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचे दोन जामीनदार या अटींवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. रामदास कदम यांच्यावतीने
ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर यांनी काम पाहिले.