प्रतिनिधी /बेळगाव
लसीकरणानंतर तीन मुलांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना रामदुर्ग तालुक्मयात घडली असून जिल्हा आरोग्याधिकाऱयांनी या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांच्या हलगर्जीपणामुळे ही मुले दगावल्याचा आरोप होत आहे.
पवित्रा हुलगूर (वय 13 महिने) रा. बोचबाळ, ता. रामदुर्ग, मधु कुरगुंदी (वय 14 महिने) रा. बोचबाळ व चेतन (वय दीड वर्षे) रा. मल्लापूर, ता. रामदुर्ग अशी त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. लसीकरणानंतर या मुलांची प्रकृती खालावल्याने यापैकी दोघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. उपचारांचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला आहे.
सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 11 व 12 जानेवारी रोजी लहान मुलांना लस देण्यात आली होती. या परिसरातील 25 मुलांना वेगवेगळय़ा लसी देण्यात आल्या होत्या. 25 पैकी 6 जणांना कांजण्या प्रतिबंधक लस देण्यात आली होती. त्यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या लसीकरणानंतर ही घटना घडली आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. सतीश पोतदार यांनी तीन मुले दगावण्यास कारणीभूत असलेल्या लसीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविल्याचे सांगितले. याबरोबरच रविवारी एका मुलाची शवचिकित्सा करण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.
यासंबंधी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ म्हणाले, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱयांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच या मुलांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा उलगडा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लसीकरणानंतर बालकांना उलटी, जुलाब
लसीकरणानंतर त्या बालकांना उलटी जुलाब सुरू झाले. 13 जानेवारी रोजी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लसीकरणानंतर लगेच मुलांचे आरोग्य खालावले. गावात एकीकडे लहान मुलांचे तर दुसरीकडे कोरोना लसीकरण सुरू होते. चुकून या मुलांना कोरोना लस दिली आहे का, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. कारण एकाच केंद्रावर हे दोन्ही लसीकरण सुरू होते. त्यामुळे गावकऱयांचा संशय बळावला आहे. जिल्हा आरोग्याधिकाऱयांनी मात्र गावकऱयांचा हा आरोप फेटाळला आहे.
प्राथमिक अहवालानुसार लसीच्या दुष्परिणामामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे मलमूत्राचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर निश्चित माहिती मिळणार आहे. तीनपैकी दोन मुलांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर एका मुलाचा गावातच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू होता.
आरोग्यमंत्र्यांनी अहवाल मागवला रामदुर्ग तालुक्मयातील तीन मुले दगावल्या प्रकरणी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी अहवाल मागविला आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. 12 ते 15 महिने वयाच्या मुलांना रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. लस घेतलेल्या तीन मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यासंबंधी अहवाल देण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.