वार्ताहर/ रामनगर
रामनगर-खानापूर रस्त्यावर दररोज अवजड वाहने अडकून पडत असल्याने इतर छोटय़ा-मोठय़ा वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर न्यायालयाच्या आदेशावरून महामार्गाच्या कामाला स्थगिती आल्याने वनविभागाकडून सदर काम घेतलेल्या ठेकेदाराला सक्त मनाई करण्यात आली आहे. तर रस्ता अर्धवट असल्याने ठेकेदाराने अवजड वाहनांना बंदी असल्याचे अनेक ठिकाणी फलकही लावले आहेत.
खानापूर-नंदगड क्रॉसजवळ अवजड वाहने येऊ नयेत म्हणून गेटही घालण्यात आला आहे. परंतु वाहनचालक या ठिकाणच्या कर्मचाऱयांना अरेरावी करत मोठय़ा प्रमाणात वाहतूक करत आहेत. यामुळे दररोज वाहने अडकून पडत आहेत. वाहने अडकलेल्या ठिकाणी घालण्यात आलेली खडी एक-दोन दिवसात पुन्हा उतरल्याने वाहने या मार्गावर अडकत आहेत. मात्र अवजड वाहने अडकत असल्याने इतर वाहनधारकांना ही दररोजची डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अजून किती दिवस हा वनवास भोगावा? असे प्रश्न येथून ये-जा करणारे वाहनचालक करत आहेत.
या मार्गावर खासगी जमिनीत तेवढेच सदर ठेकेदाराचे काम चालू असून वनखात्याच्या जागेत मोठय़ा प्रमाणात वाहने अडकत असणाऱया जागीही तात्पुरते खडीकरण करण्यास वनविभाग आक्षेप घेत असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. आपण लवकर काम सुरू करण्यासाठी इच्छूक आहे पण स्थगिती हटल्यावरच काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.