ऑनलाईन टीम / पुणे :
राममंदिर हा देशाच्या अस्मितेचा विषय होता. अयोध्येत राममंदिर उभे राहावे, अशी सामान्य माणसाची इच्छा होती. त्यामुळे राममंदिर हे राष्ट्र मंदिर तर आहेच, शिवाय ते स्वातंत्र्य मंदिर आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे ऑनलाईन आठवे पुष्प आज सकाळी दहा वाजता देवेंद्र फडणवीस यांनी गुंफले. फडणवीस यांच्या ‘रामजन्मभूमी : संघर्ष आणि संकल्पपूर्ती’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला.
फडणवीस यांनी राममंदिर आंदोलन इतिहासाचे, त्यामधील त्यांच्या योगदानाचे आणि आलेल्या अनुभवांचे कथन केले. फडणवीस म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढा जसा महत्त्वाचा आहे, तसा राममंदिर स्वातंत्र्य आंदोलनाचा लढाही तितकाच महत्त्वाचा आहे. पराजयाचे प्रतीक पुसले जावे आणि तिथे अस्मितेचे प्रतीक उभारले जावे, यासाठी पाचशे वर्षे संघर्ष सुरू होता. स्वातंत्र्याच्या 40 वर्षांनंतरही तत्कालीन सरकारने मंदिर उभारण्यासाठी काहीच केले नाही. 1989 मध्ये पहिल्यांदा विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेऊन मंदिराची पायाभरणी केली. पुढे लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेच्या माध्यमातून रामजन्मभूमी आंदोलनाला गती मिळवून दिली.
‘मंदिर वहीं बनायेंगे, मंदिर भव्य बनवायचे या हेतूने, मला तिन्ही कारसेवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी रामशिलापूजन कार्यक्रमानिमित्ताने रामजन्मभूमी आंदोलन चळवळीशी जोडलो गेल्याची आठवण ही त्यांनी यानिमित्ताने सांगितली.