रामायण-महाभारताला शालेय अभ्यासक्रमात स्थान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रामायण आणि महाभारताचा नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमात समावेश होऊ शकतो. शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमात त्यांना भारताच्या क्लासिकल पीरियडच्या श्रेणीत समाविष्ट केले जाऊ शकते. एनसीईआरटीच्या उच्चस्तरीय समितीने यासंबंधी शिफारस केली आहे. रामायण आणि महाभारतावर आधारित धडे कुठल्या वर्गातील मुलांना शिकविण्यात येणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
शाळेतील प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिली जावी. ही प्रस्तावना प्रादेशिक भाषेत असावी असा प्रस्तावही समितीने मांडल्याची माहिती प्राध्यापक सी.आय. इसाक यांनी दिली आहे. इसाक हे इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
एनसीईआरटीची सामाजिक शास्त्र समिती शाळांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम नव्याने निर्धारित करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम तयार करण्यात यावी तसेच पुस्तकांमध्ये वेद आणि आयुर्वेदाला सामील करण्यात यावे असा प्रस्तावही या समितीने मांडला आहे.
हा प्रस्ताव एनसीईआरटीचे नवे पाठ्यापुस्तक करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. परंतु या प्रस्तावाला एनसीईआरटीकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. अभ्यासक्रम नव्या पद्धतीने विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याविषयी आताच काही बोलणे घाईचे ठरणार असल्याचे एनसीईआरटीने ऑक्टोबरमध्ये म्हटले होते.
इतिहासाला 4 हिस्स्यांमध्ये विभागण्याची आम्ही सूचना केली आहे. एक क्लासिकल पीरियड, दुसरा मेडिएवल पीरियड म्हणजेच मध्यकाळ तिसरा ब्रिटिश काळ आणि चौथा आधुनिक भारत असे हिस्से असतील. सध्या इतिहास तीन हिस्स्यांमध्येच शिकविला जातो, ज्यात प्राचीन भारत, मध्यकालीन भारत आणि आधुनिक भारत यांचा समावेश असल्याची माहिती प्राध्यापक इसाक यांनी दिली आहे. प्राचीन भारतात आम्ही रामायण आणि महाभारत शिकविण्याची सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
एनसीईआरटी समितीचे प्रस्ताव
-घटनेची प्रस्तावना प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर स्थानिक भाषेत लिहिण्यात यावी.
-नव्या पाठ्यापुस्तकात भारतात राज्य केलेल्या सर्व वंशांचा उल्लेख असावा.
-पाठ्यापुस्तकातून भारतीय नायक आणि त्यांच्या संघर्षाविषयी शिकविले जावे.
-पाठ्यापुस्तकात इंडियाऐवजी भारत असा उल्लेख असावा.