वृत्तसंस्था/ प्रयागराज
अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही, त्यावर काही बंधने देखील आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कुणालाच इतरांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचविण्याचा अधिकार नसल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भगवान राम-कृष्णाबद्दल इंटरनेट मीडियावर अश्लील टिप्पणी प्रकरणी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने रामाशिवाय भारत अपूर्ण आहे. ज्या देशात आपण राहतो, तेथील महापुरुष, संस्कृतीचा आदर करणे आवश्यक आहे. ईश्वराचे अस्तित्व मान्य न करणाऱया व्यक्तीला देखील इतरांच्या श्रद्धेला ठेच पोहोचविण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले आहे.
न्यायालयाने भगवान राम, कृष्णाच्या विरोधात अश्लील टिप्पणी करणाऱया एका आरोपीला असा गुन्हा पुन्हा न करण्याची ताकीद देत सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपीने घटनेने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले असल्याने याला गुन्हा मानले जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद केला होता.
आमच्या ऋषी-मुनींनी देवत्व प्राप्त करण्याचे मार्ग दाखविले आहेत. रामायण-महाभारतामध्ये भारताच्या आत्म्याचे दर्शन होतात असे रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटले होते. महात्मा गांधी यांच्या जीवनातही रामाचे महत्त्व राहिले आहे. सामाािक समरसता रामायणापेक्षा अधिक कुठेच दिसून येत नाही. अशा स्थितीत राम-कृष्णाच्या विरोधात अश्लील टिप्पणी माफीयोग्य नाही. हिंदूंमध्येच नव्हे तर मुस्लिमांमध्येही कृष्णभक्त राहिले आहेत. रसखान, अमीर खुसरो, आलम शेख, वाजिद अली शेख, नजीर अकबराबादी हे राम-कृष्णाचे भक्त राहिले आहेत. राम-कृष्णाचा अपमान पूर्ण देशाचा अपमान असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.