चंद्रकांत देवरुखकर / सातारा :
देशाच्या स्वातंत्र्यानंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातील रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. मात्र, केवळ महाराष्ट्रातच हा समाज विमुक्त जमातीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे राज्यात या समाजाची प्रगती होऊ शकलेली नाही. रामोशी समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी सातारा जिल्हय़ातून एक रणरागिणी उभी राहिली. तिने महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या माध्यतातून वादळ निर्माण केले. सातारा जिल्हय़ातील रामोशी समाज तिच्या पाठीशी एकवटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह जिल्हय़ातील खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदेंचा आशीर्वाद प्रिया नाईक यांच्या कार्याला लाभला होता.
रामोशी समाज पुरातन कालापासून शूरवीर म्हणून गर्जत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या समाजाला रणमैदान गाजवण्याची संधी मिळाली होती. मात्र, कालौघात या समाजाची वाताहत होत गेली. भटकंती करत उपजिविकेचे कोणतेही साधन नसल्याने मग कोणत्या तरी इनामदार, पाटलांची चाकरी करणे आणि इतरांसाठी चोऱ्या, मारामाऱ्या करणे, दारु गाळणे हेच रामोशी समाजाच्या नशिबी आले आहे. या सगळय़ातून रामोशी समाजाची सुटका व्हावी, रामोशी समाजातील मुलांनी शिक्षणाच्या वाटा धुंडाळल्या पाहिजेत यासाठी प्रियाताई नाईक यांनी जिल्हाभरात गावोगावी स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या माध्यमातून समाजात एकजूट बांधण्यास आरंभ केला. शिवकालानंतर खऱ्या अर्थाने राज्यातील रामोशी समाजाची वाताहत झाली आहे. उपजीविकेसाठी पारंपरिक व्यवसाय उरले नसल्याने ब्रिटिशकाळापासून आजवर कधी स्वत:साठी, तर कधी इतरांसाठी चोऱ्या, मारामाऱ्या करणे आणि दारू गाळणे हेच या समाजाच्या नशिबी आले आहे. भटक्या विमुक्तांमधील आरक्षणातून या समाजाच्या वाटय़ाला फारसे काहीही आलेले नाही. त्यामुळे देशातील अन्य राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील रामोशी, बेडर, बेरड व तत्सम पोटजातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाला पाहिजे यासाठी जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपर्यंत उभा संघर्ष केला व अद्यापही तो सुरु आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी योद्धय़ांच्या नामावलीत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्ष वेधून घेतो. इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला. राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. त्या गावी त्यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी प्रियाताई नाईक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
रामोशी समाजातील युवक, युवतींना संघटीत करुन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देताना त्यांना रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले असून त्यासाठी गावोगावी भ्रमंती करताना मान्यवरांच्या उपस्थित रामोशी समाजाचे मेळावे आयोजित करुन सातत्याने रामोशी समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रियाताई नाईक यांनी काम सुरु ठेवले असून त्यांना समाजाकडून मोठा पाठिंबा लाभत आहे. एक महिला रामोशी समाजाचे संघटन करत राजकीय पक्षांनी बळ दिले. स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या माध्यमातून प्रियाताई नाईक यांची वाटचाल भरारी घेत असताना एक महिलेचे नेतृत्व नको म्हणून समाजातील काहींनी अडचणीही निर्माण केल्या. मात्र, ही रणरागिणी अनेक संकटावर मात करुन आज देखील रामोशी समाजाचे प्रश्न लढा उभारण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. या कालावधीत काही वेळा राजकीय पक्ष बदल करण्याची वेळ आली. घरावर हल्लाही झाला पण ही वाघिण डगमगलेली नाही. तिचा लढा सुरुच असून रामोशी समाजाने या रणरागिणीला बळ देण्याची गरज आहे.
राजे उमाजी नाईकांची वाघिण हरणार नाही
स्वाभिमानी रामोशी महासंघाची वाटचाल यशशिखराकडे सुरु असतानाच एका प्रकरणाशी वैयक्तिकदृष्टय़ा माझा काही संबंध नसताना मला तुरुंगात बसण्याची वेळ काही प्रवत्तींनी आणली. नियतीच्या दरबारात न्याय उशिरा मिळत असल्याने मी अनेक संकटातून वाटचाल केली. त्याचे परिणाम माझ्या कुटुंबावर झालेले आहेत. मात्र, मी लढा बंद केलेला नाही. मी सत्याला पाठ फिरवणारी राजे उमाजी नाईकाची वाघिण नाही. आहे. आता वादळांना माझी भीती वाटेल.
-प्रिया नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी रामोशी महासंघ