देणग्या गोळा करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर न्यासाची घोषणा
अयोध्या / वृत्तसंस्था
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदिर निर्माण करण्याच्या कामाकरिता देशभरातून 2 हजार 100 कोटी रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे. शनिवारी देणग्या गोळा करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर रविवारी ही घोषणा राम मंदिर न्यासाकडून करण्यात आली.
15 जानेवारीपासून निधी संकलन हाती घेण्यात आले होते. भारतातील किमान 5 लाख खेडी, असंख्य छोटी शहरे आणि मध्यम तसेच महानगरांमधील घराघरांमधून न्यासाच्या कार्यकर्त्यांनी निधी गोळा केला. 27 फेब्रुवारी हा संकलनाचा शेवटचा दिवस होता. प्रारंभी न्यासाने 1 हजार 100 कोटी रुपये गोळा करण्याचे ध्येय ठेवले होते. तथापि, अंतिमतः हे ध्येय पार करून त्यापेक्षा 1 हजार कोटींचा निधी जास्त प्रमाणात संकलित झाला आहे. निधी संकलन कार्यक्रमात साधारणतः अडीच लाख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
अतिरिक्त निधीचा उपयोग
राम मंदिर निर्माणाच्या कार्याला लागणारा निधी सोडून जे अतिरिक्त धन गोळा झाले आहे, त्याचा उपयोग अयोध्येत संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी करण्यात यावा. तसेच अयोध्येतील गोरगरिबांना दूध पुरविण्यासाठी गोशाळा स्थापन करण्यात यावी, अशी सूचना तपस्वी चावनी पीठाधीश स्वामी परमहंस आचार्य यांनी केली. तथापि, राम मंदिर निर्माण कार्यासाठी नेमका किती निधी लागणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यासंबंधीची माहिती वास्तू पूर्ण झाल्यानंतरच कळू शकेल, असे प्रतिपादन न्यासाचे एक सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी केले.
अयोध्येच्या विकासासाठी…
राम मंदिरासाठी देशभरातील कोटय़वधी नागरिकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे वास्तूरचनेनंतर उरलेला निधी अयोध्यानगरीचा विकास आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जावा, अशी सूचना निर्मोही आखाडय़ाचे प्रमुख महंत धीनेंद्र दास यांनी केली. अयोध्येतील मंदिरांच्या विकासासाठीही या निधीच्या काही भागाचा उपयोग केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.