ऑनलाईन टीम / पुणे :
राममंदिराची निर्मिती म्हणजे राष्ट्रमंदिराची निर्मिती होय. त्यामुळे राष्ट्रातील प्रत्येकाचा सहभाग अपेक्षित आहे. हाच निधी संकलनाचा प्रमुख हेतू आहे. नागालॅण्ड, त्रिपुरा, आसाम या राज्यातील ख्रिश्चन संघटनांनीही या अभियानात निधी समर्पित केला आहे. जेव्हा अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम पूर्ण होईल तेव्हा प्रत्येकाने तेथे दर्शनासाठी जाणे अपेक्षित आहे. असे मत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले.
पुण्याच्या महात्मा फुले मंडईमधील छोट्या-मोठ्या व्यापार्यांनी मिळून आज अयोध्या येथे उभारणी होत असलेल्या राम मंदिरासाठी एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा निधी भाजयुमोचे शहर सरचिटणीस करण मिसाळ यांच्या हस्ते विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे यांच्याकडे आज समर्पित करण्यात आला. यावेळी देशपांडे बोलत होते.
यासाठी मंडईच्या मध्यवर्ती ठिकाणी गेले दहा दिवस दानपेटी ठेवण्यात आली होती. मंडईतील छोट्या-छोट्या व्यापार्यांनी काही समर्पण करू इच्छित होते. पण एकाच वेळी मोठी रक्कम समर्पण करणे शक्य होणार नाही, हे ओळखून महात्मा फुले मंडई शेतीमाल विक्री संघटनेने या दानपेटीची अभिनव कल्पना राबविली. शहरात अशाप्रकारचे एकमेव अभियान राबविण्यात आले. त्याचे नियोजन प्रशांत गोखले आणि राजाभाऊ कासुर्डे यांनी केले.
रोज संध्याकाळी त्यात यथाशक्ती समर्पण करून निधी उभा करावा अशी योजना होती. त्यातून आज समर्पणाच्या अखेरच्या दिवशी एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हजार रुपयांचा निधी गोळा करून तो समर्पित करण्यात आला. या रकमेचा एकत्रित धनादेश भाजयुमोचे सरचिटणीस करण मिसाळ यांच्या हस्ते विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.