बोडगेश्वर, वास्को, दवर्ली, पर्तगाळ येथे होणार कार्यक्रम
प्रतिनिधी/ पणजी
राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रारंभ करण्यात आलेली रामराज्य दिग्विजय रथयात्रा दि. 5 नोव्हेंबर रोजी गोव्यात पोहोचत आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री मोहन आमशेकर यांनी दिली.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी परिषदेचे गोवा प्रांत अध्यक्ष संतोष म. नाईक, उपाध्यक्ष प्रभाताई वेर्णेकर, श्याम नाईक, यात्रा प्रमुख परशुराम शेटय़े, दक्षिण गोवा प्रांतमंत्री कुणाल धारगळकर आणि उत्तर गोवा मंत्री शंभू परब आदींची उपस्थिती होती.
दसऱयादिनी दि. 5 ऑक्टोबर रोजी अयोध्येतून ही यात्रा प्रारंभ करण्यात आली होती. त्याद्वारे पुढील 60 दिवसात नेपाळसह भारतातील 27 राज्यांचा 15 हजार किमी प्रवास करणार आहे. दि. 3 डिसेंबर रोजी यात्रेची पुन्हा अयोध्येत सांगता होणार आहे.
गोव्यात दि. 5 रोजी रथयात्रेचे आगमन होणार असून सकाळी 10 वाजता पत्रादेवी येथे गोमंतकीयांतर्फे तिचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता ही यात्रा बोडगेश्वर देवस्थान प्रांगणात पोहोचेल. त्यावेळी उत्तर गोव्यातील सर्व मंदिरांचे प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहून श्रीरामांच्या पादुकांचे पूजन करणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खास उपस्थिती लाभणार आहे, असे आमशेकर यांनी सांगितले.
गोव्यात केवळ एका दिवसाचे वास्तव्य असल्याने ही रथयात्रा प्रमुख राष्ट्रीय महामार्गानेच प्रस्थान करणार आहे. दुपारी यात्रेचे आगमन वास्कोत होणार असून तेथील श्रीराममंदिरात त्यांचे स्वागत करण्यात येईल. तेथून वेर्णामार्गे मडगावकडे प्रस्थान करेल. हा रथ दवर्ली येथे काही क्षण थांबणार असून दक्षिण गोवा समितीचे भाई नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 नंतर रथ काणकोणच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. वाटेत पर्तगाळ मठात या यात्रेचा मुक्काम असेल. तेथे मठातर्फे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
दि. 6 रोजी पहाटे 5 वाजता पादुका पूजन होईल. त्यानंतर गोवत्स पूजन, तसेच वृक्षारोपण होणार आहे. त्यात रुद्राक्ष आणि कैलासपती ही दोन झाडे लावण्यात येतील. त्यानंतर चहा-फराळ होऊन रथ पुढील यात्रेसाठी कर्नाटकच्या दिशेने मार्गस्थ होईल. या यात्रेदरम्यान प्रत्येक मतदारसंघात त्या त्या भागाचे आमदार व अन्य लोकप्रतिनिधी, मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, असे आमशेकर यांनी सांगितले.
6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात ’हितचिंतक अभियान’
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेतर्फे ’हितचिंतक अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. दि. 6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण देशभरात हे अभियान होणार असून त्याचाच भाग म्हणून गोव्यातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यातून मिळून किमान 50 हजार हितचिंतक सहभागी होतील, अशी माहिती आमशेकर यांनी दिली. या परिषदेचे हितचिंतक होण्यासाठी इच्छुकांना 20 रुपये किंमतीचे कुपन घ्यावे लागणार आहे. त्यावेळी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक घरात विश्व हिंदू परिषदेची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात येईल. परिषदेचे उत्तर गोव्यात 9 प्रखंड असून त्यांची 40 खंडात विभागणी करण्यात आली आहे. त्यात 214 गावांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात 9 प्रखंड, 48 खंड असून त्यात 347 गावांचा समावेश आहे. परिषदेचे हितचिंतक संपूर्ण 15 दिवसांच्या कार्यकाळात या सर्व प्रखंड, खंड आणि गावांना भेटी देतील, अशी माहिती आमशेकर यांनी दिली.