प्रतिनिधी/ महाबळेश्वर
किल्ले प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या 35 गावांचा अतिवृष्टीमुळे संपर्क तुटला होता. आमदार मकरंद पाटील व आमदार अजय चौधरी यांच्या विनंतीनुसार रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या सर्व प्रकारची मदत घेवून संपर्क तुटलेल्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या कुंभरोशी गावात पोहचल्या.
22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात हाहाकार माजला होता. कोयना, वेण्णा, सोळशी, कांदाटी या नद्यांना महापूर आला. नदीचे पाणी पात्र सोडून पात्रा लगत असलेल्या भागात शिरले. त्यामुळे अनेक गावांची शेती वाहून गेली. अनेक पूल वाहून गेले तर अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले. अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्या. अंबेनळी घाटात देखिल अनेक ठिकाणी रस्ता तुटल्याने किल्ले प्रतापगड पंचक्रोशीतील 35 गावांचा सातारा जिल्हय़ाशी असलेला संपर्क तुटला. अंबेनळी घाट रस्त्याच्या नुकसानीची पाहणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. त्यावेळी घट दुरूस्त होण्यास साधारण 1 ते दीड महिला लागणार याची कल्पना आली. रस्ता नसला तरी या भागातील लोकांपर्यंत मदत पोहचलीच पाहिजे. या जाणीवेने आमदार मकरंद पाटील हे अस्वस्थ झाले. त्यांनी जलमार्गाने या गावापर्यंत मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ठराविक अंतरानंतर मदत पोहचविण्यासाठी रस्त्यांचीच गरज लागणार होती. आणि रस्तेच मोडून पडल्याने किल्ले प्रतापगड भागातील लोकांपर्यंत मदत पोहचविण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश आले. सातारा जिल्हय़ाला कोकणाची हद्द लागून आहे. पोलादपूर मार्गे कुंभरोशी पर्यंत मदत पोहचविता येईल म्हणून आमदार मकरंद पाटील यांनी रायगड जिल्हय़ाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने मदत पोहचविण्याची विनंती केली. आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमाणेच आमदार अजय चौधरी व किल्ले प्रतापगडावरील ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत उत्तेकर यांनी देखील तटकरे यांना मदतीसाठी विनंती केली.
रायगड जिल्हय़ाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पोलादपूर कुंभरोशी या मार्गावरील सर्व अडथळे दूर करून व आवश्यक ती दुरूस्तीकरून कुंभरोशीपर्यंतच्या रस्ता कुंभरोशी परिसरातील 35 गावांशी थेट संपर्क जोडला. आज 31 जुलै रोजी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या सर्व प्रकारची मदत घेवून कुंभरोशी येथे पोहचल्या. संपर्क तुटलेल्या कुंभरोशी येथे तब्बल दहा दिवसांनी मदत घेवून पालकमंत्री तटकरे पोहचल्याने या पंचक्रोशीतील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला.
संपर्क तुटलेल्या कुंभरोशी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी तटकरे यांनी सर्व प्रकारची औषधे सोबत एक वैद्यकीय पथक सोबत आणले होते. ताज हॉटेलमध्ये तयार केलेले रेडी टू इट अशी अन्नाची दहा हजार पॅकेट भरलेले कंटेनर आणले होते. या शिवाय अन्नधान्याचे 450 किट भरलेला ट्रक सोबत आणलाच होता. ही सर्व मदत उतरून घेण्याचे काम ग्रामस्थ करीत असताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महापुरामुळे शेतीचे नुकसान झाले त्याची पाहणी केली.
रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सोबत प्रांताधिकारी इनामदार, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील, कुंभरोशीचे ग्रामस्थ चंद्रकांत उतेकर, अभय हवालदार, प्रकाश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कुंभरोशी पोलादपूर रस्ता दुरूस्ती करण्यासाठी 3 जेसीपी व कर्मचारी यांचे पथक गेली पाच दिवसापासून येथे तळ ठोकून आहे. कुंभरोशी ते किल्ले प्रतापगड या रस्त्याच्या दुरूस्तीचे कामही रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यासाठी लागणारे पाईप उद्या पोहचणार असून या मार्गावरील वाहतूकही लवकरच सुरू करण्यात येईल.
नागरिकांच्या व्यथा ऐकल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जो पर्यंत सातारा जिल्हय़ाशी संपर्क जोडला जात नाही आणि तुम्ही थांबा म्हणत नाही तो पर्यंत सर्व मदत तुम्हाला करणार आहे.