ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे.
रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री अलीबागमधील थळ या ठिकाणी दाखल झाले आहेत. रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मदतीची घोषणा केली. तसेच इतर जिल्ह्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन मदत जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडला सर्वाधिक बसला आहे. जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाल्याचे आणि हजारो झाडे उन्मळून पडल्याचे कालच रायगडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मी आज जिल्ह्याची पाहणी केली. त्यावरून रायगड जिल्ह्याला तातडीची मदत गरजेची आहे. त्यामुळे कोणतेही पॅकेज जाहीर न करता राज्य सरकारकडून 100 कोटींची मदत जाहीर करत आहे.
जिल्हा प्रशासनाने कोणत्याही आदेशाची वाट न बघता कामाला सुरुवात केली आहे. साधारणपणे 10 दिवसात पंचनामे पूर्ण होतील, त्यानुसार पुढील घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.