वार्ताहर/ राजापूर
कोकणातील आंब्यासह अन्य माल वाहतूक करण्यासाठी आता राज्य परिवहन मंडळाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक बसमधून सोमवार दि.25 रोजी राजापूर तालुक्यातील रायपाटण ते औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर पहिल्यांदा आंब्याच्या वाहतुकीला प्रारंभ झाला. ‘कोकणबाग’ या शेतकरी समूहाला हा पहिला मान मिळाला.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने याचा फटका सर्वांना बसत आहे. लॉकडाऊनमध्ये एसटी वाहतूक ठप्प झाल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा मोठा फटका बसला आहे. महामंडळाचे कोटय़ावधीचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे एसटी आर्थिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य परिवहन महामंडळाने मालवाहतूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मालवाहतुकीच्या रूपाने या सेवेच्या नव्या अध्यायाला आता प्रारंभ होत आहे. राजापूरातील ‘कोकणबाग’ या शेतकऱयांच्या समूहाचे संचालक महेश पळसुलेदेसाई यांनी रायपाटण ते औरंगाबाद अशा लांब पल्ल्यासाठी मालवाहतूक बस आरक्षित केली. सोमवारी पहाटे मालवाहतूक बस रायपाटण येथे दाखल झाली. बसमध्ये तब्बल 3.5 टन म्हणजेच 1000 डझन हापूस आंबा भरण्यात आला आणि वाहक-चालकासह बस औरंगाबादच्या दिशेने रवाना करण्यात आली.
या कामी जिल्हा वाहतूक अधिकारी जगताप, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोरे यांनी या कामी पुढाकार घेऊन शेतकऱयांना सहकार्य केले. यासाठी ‘कोकणबाग’चे संचालक महेश पळसुलेदेसाई, व्यंकटेश कल्याणकर, व्यवस्थापक दीपक पवार, मंदार गांगण आदींनी सहकार्य केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अनेक अधिकारी निरीक्षण आणि आंबा वाहतुकीची माहिती घेण्यासाठी उपस्थित होते. ‘खाजगी वाहतुकीपेक्षा कमी खर्चात आणि सुरक्षितपणे मालवाहतूक उपलब्ध करून दिल्याबद्दल महामंडळाचे आभारी आहोत. ही सेवा यापूर्वीच सुरु झाली असती तर अधिक लाभ झाला असता’, अशा प्रतिक्रिया पळसुलेदेसाई यांनी व्यक्त केली.
दरम्यान औरंगाबादला निघालेल्या मालवाहतूक बसचे वाहक पवार येत्या 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, बसने मालवाहतूक करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी या बसमध्ये डय़ुटी देण्याची विनंती केली. महामंडळानेही त्यांना डय़ुटी देऊन या कामी सहभागी होण्याची संधी दिली.