किमान महिनाभर पूल बंद राहण्याची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
पणजी ते रायबंदर दरम्यानच्या सुमारे 388 वर्षे जुन्या पाटो पुलाचा काही भाग बुधवारी पहाटे कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली असून सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्याचे दुरुस्तीकाम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरीही किमान महिनाभर तरी तो बंदच राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पोर्तुगीजकाळात वर्ष 1634 मध्ये बांधून पूर्ण झालेला सुमारे 3.2 कि मी. लांबीचा हा पूल त्यावेळी जगातील सर्वात लांब पूल ठरला होता. सर्वात वैशिष्ठय़पूर्ण बाब म्हणजे बांधकाम साहित्य आणण्यासाठी वाहतुकीची कोणतीही साधने नसताना सुद्धा केवळ एका वर्षाच्या आत या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. त्याकाळी केवळ बैलगाडी किंवा घोडागाडी यांच्या वाहतुकीसाठी उपयोगी पडेल एवढय़ाच विचाराने त्याचे बांधकाम करण्यात आले होते. तरीही शेकडो वर्षांनंतरही आजच्या रोज होणाऱया हजारो वाहनांसाठीही तो वापरात येत आहे.
सदर पूल आज जरी एक बांधसदृष्य दिसत असला तरी सुमारे 40 खांबांवर उभा असलेला पूलच असून त्याखालून दोन्ही बाजूनी पाणी जाण्या-येण्याची व्यवस्था आहे. मात्र चिखलामुळे बुजल्याने सध्या तो पूल असल्याचे सांगुनही खरे वाटणार नाही, अशा स्थितीत पोहोचला आहे.
एका बाजूने मांडवी नदीचा अफाट जलाशय तर दुसऱया बाजूने खाजन शेती आणि मिठागरे अशा जागेत बांधण्यात आलेला सदर पूल प्रत्यक्षात आजच्या मुख्य टपाल कचेरीपासून रायबंदर पर्यंत लांब होता. मात्र नंतरच्या काळात झालेला पणजीचा विस्तार सध्याच्या दिवजा सर्कलपर्यंत पोहोचला. त्यामुळे पुलाची लांबी बऱयाच अंशी घटत गेली.
बुधवारी घडलेल्या घटनेत कोसळलेला पुलाचा भाग हा दिवजा सर्कलपासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे. प्रत्यक्षात सदर भाग बऱयाच दिवसांपूर्वी खचलेल्या स्थितीत नदीत कलंडून राहिला होता. त्यामुळे वाहन चालकांना कल्पना देण्यासाठी तेथे पिंपे ठेवून खचलेला भाग बंद करण्यात आला होता. लवकरच त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु वाहतूक बंद करण्यासंबंधी जिल्हाधिकारी आणि वाहतूक खात्याकडून आदेश मिळविण्यात उशीर झाला. त्याचा परिणाम पूलाचा भाग कोसळण्यात झाला. आता साबांखा रस्ता विभागातर्फे युद्धपातळीवर त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे.
या पुलाला यापूर्वीही 2011 व 2014 मध्ये खचणे, तडे जाणे यासारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी साबांखा तर्फे त्याची दुरुस्ती करण्यात येऊन संरक्षक भिंती बांधून आधार देण्यात आला होता. या पुलाला वारंवार निर्माण होणारे धोके लक्षात घेता त्यावरील वाहतूक कदंब पठार मार्गे वळविण्यात आली होती.
मध्यंतरी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांच्या कारकीर्दीत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंदच करण्याचाही विचार चालविला होता. या पुलाला समांतर पूल बांधून जुना पूल सायकलिंग ट्रक, पादचारी वाहतुकीसाठी ठेवण्यात येणार होता. पर्यायाने ते एक पर्यटक आकर्षण ठिकाण बनविण्याची योजना होती. परंतु नंतरच्या राजकीय घडामोडीत सदर निर्णय सत्यात येऊ शकला नाही. त्यामुळे सध्या या पुलाच्या अस्तित्वासच धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, अशाप्रकारे रोज रोज चाललेली दुरुस्ती ही सदर पुलासाठी केवळ मलमपट्टी ठरत असून त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. त्यासंबंधी काही पर्यावरणप्रेमींनी गोवा सरकार, केंद्रीय पुरातत्व खाते यांच्यासह युनेस्कोलाही पत्रे लिहून शेकडो वर्षे जुन्या या पुलाचे भावी पिढय़ांसाठी जतन करण्याचे आवाहन केले होते.