वार्ताहर/ रायबाग
कृषी कायदे मागे घ्यावेत, लॉकडाऊन काळातील नुकसानभरपाई द्यावी, विद्युत खासगीकरण कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्या करत रायबाग मिनी विधानसौध कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून रयत संघ व हसिरु सेना संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
रयत संघ तालुका अध्यक्ष मल्लाप्पा अंगडी यांनी सरकार शेतकरीविरोधी असून विविध कारणांनी शेतकऱयांना त्रास दिला जात आहे. अधिकारीवर्ग शेतकऱयांचे शोषण करत आहे. सर्वत्र गैरव्यवहार पसरला आहे. कोरोनाकाळात शेतकऱयांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. याची दखल घेत शेतकऱयांना साहाय्यधन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याबरोबर तालुक्यातील खत विक्री दुकानात दरफलक बसवावेत, साहाय्यधन मंजूर करावे, नादुरुस्त झालेले ट्रान्स्फॉर्मर बदलावेत, प्राथमिक कृषी पत्तीन संघात खत पुरवठा सुरळीत करावा, शेतकऱयांना विशेष पॅकेज द्यावे, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, तहसीलदार व तालुका अधिकाऱयांची कमीत कमी तीन वर्षानंतर बदली करावी, अशा मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत. येथील मिनी विधानसौधसमोर गेटबंद आंदोलनप्रसंगी कल्लणगौडा पाटील, शिवानंद चौगला, काशिराम कल्याणी, तम्मण्णा पाटील, लक्काप्पा जोडटी यांच्यासह रयत व हसिरु सेना संघटनेचे पदाधिकारी व शेतकरीवर्ग उपस्थित होता.