वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी बर्मिंगहॅममध्ये होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा हॉकी स्पर्धेतून भारताने माघार घेतली आहे. कोरोनाची भीती आणि भारतीय प्रवाशांसाठी असणारे इंग्लंडच्या त्रासदायक ठरणाऱया क्वारंटाईन नियमावलीमुळे हा निर्णय घेतल्याचे भारताने स्पष्ट केले.
याच कारणास्तव इंग्लंडनेही भुवनेश्वरमध्ये होणाऱया कनिष्ठांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर दुसऱयाच दिवशी भारतानेही राष्ट्रकुलमधून माघारीचा निर्णय घेतला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ग्यानेंद्रो निन्गोम्बम यांनी आपला हा निर्णय भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांना कळविला आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा (28 जुलै-8 ऑगस्ट) व हँगझोयू आशियाई क्रीडा स्पर्धा (10-25 सप्टेंबर) या दोन स्पर्धांमध्ये केवळ 32 दिवसांचा मोकळा वेळ मिळत असल्याचे कारण भारताने दिले. इंग्लंडमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने खेळाडूंना तेथे पाठविण्याचा धोका पत्करणार नसल्याचे हॉकी इंडियाने म्हटले आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टिकोनातून आशियाई स्पर्धा महत्त्वाची असल्याने हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.