हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे. मात्र 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकाच्या हातामध्ये राष्ट्रध्वज असतो. मात्र राष्ट्रध्वज त्याच दिवशी कचरापेटी किंवा फाटलेल्या अवस्थेत गटारीत फेकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होत आहे. ही विटंबना रोखावी यासाठी हिंदू जनजागृती गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. तेंव्हा तातडीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने शासनाला आदेश देखील दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये यासाठी योग्य कारवाई करावी, असे म्हटले आहे. मात्र अद्याप तरी त्याबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. राष्ट्रध्वज अहवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याबाबत हिंदू जनजागृती समिती जागृती करत आहे. त्यांना सहकार्य करावे, प्लास्टिक ध्वज विक्रीवर व उत्पादनावर बंदी घालावी, अशी मागणी देखील करण्यात
आली.
महत्त्वाचे म्हणजे शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे महत्त्वाचे असून त्याबाबत विशेष उपक्रम राबवावेत. वृत्तपत्रे तसेच इतर माध्यमातून जनजागृती करावी, यासह इतर मागण्या देखील करण्यात आल्या. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विजय नंदगडकर, उज्ज्वला गावडे, मिलन पवार, वैशाली यादव, प्रणाली पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.