गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची मागणी
प्रतिनिधी / मडगाव
संपूर्ण चालू वर्ष संपेपर्यंत गोव्यातील सर्व विकासकामे बंद करण्याचा आणि नोकरभरती बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मुख्य सचिवांच्या दबावाखाली घेतला असून त्यामुळे आमदार व मंत्र्यांना पुढच्या 14 महिन्यांसाठी थेट ‘होम क्वॉरंटाईन’ होण्यासाठी पाठविले गेले आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. अशा कूचकामी मंत्रिमंडळाला सत्तेवर ठेवण्याऐवजी सर्व सरकारच बरखास्त करून गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि या सर्व आमदार, मंत्र्यांना कायमचे ‘होम क्वॉरंटाईन’ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीने राज्याला हे वर्ष संपेपर्यंत जणू ‘होम क्वॉरंटाईन’ करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे. मुख्य सचिवांनी हा निर्णय मंत्रिमंडळावर थोपला असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्राकडून मिळाली असल्याचा दावा करताना यामुळे सध्या राज्याचा कारभार राज्य कार्यकारी समितीच चालवत असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी म्हटले आहे.
गोवेकरांनी सतर्क राहण्याची गरज
अशा परिस्थितीत हे सरकार गोवेकरांना लुटण्याच्या नव्या योजना घेऊन पुढे येऊ शकते. त्यामुळे गोवेकरांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. या सरकारातील बहुतेक मंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करून आलेले आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत महसुलाचे नवीन स्रोत तयार करण्याची धमक नसलेले हे मंत्री आता लोकांना लुटण्यासाठी वेगळय़ाच योजना घेऊन पुढे येऊ शकतील, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
तर एवढय़ा मोठय़ा मंत्रिमंडळाची गरजच काय ?
जर राज्याचे प्रशासन राज्य कार्यकारी समिती चालवत असेल, तर एवढय़ा मोठय़ा मंत्रिमंडळाची गरजच काय, असा सवाल करून त्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून याच नोकरशाहीच्या बळावर राज्य चालविणे अधिक चांगले, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे. गोव्यात येणारे खलाशी आणि इतर विदेशस्थ गोमंतकीय जर कोविड चाचणीत निगेटिव्ह ठरले, तर त्यांना 14 दिवस घरात विलगीकरण करून राहता येईल असा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्याचे स्वागत करताना गोमंतकीयवादी शक्तींनी मुख्यमंत्र्यांवर सतत दबाव ठेवल्यामुळेच हे होऊ शकले, असे त्यांनी म्हटले आहे.