15 वर्षांमधला प्रथमच प्रवास असल्याने बनला चर्चेचा विषय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रेल्वे प्रवास सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी शुक्रवारी 15 वर्षांमध्ये प्रथमच रेल्वेने प्रवास केला. दिल्लीहून उत्तर प्रदेशातील त्यांचे जन्मगाव असलेल्या कानपूर जिल्हय़ापर्यंत त्यांच्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना निर्बंध शिथील झाल्याने त्यांना हा प्रवास करणे शक्य झाले आहे. ते आपल्या जुन्या सहकाऱयांना भेटणार आहेत.
राष्ट्रपती बनल्यानंतर प्रथमच त्यांनी आपल्या पारौंख या जन्मगावाला भेट दिली. हे गाव कानपूरच्या रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. जन्मगावी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांनी त्यांचे बालपणीचे सवंगडी, गावातील काही बुजुर्ग व्यक्ती आणि आपल्या नातेवाईकांची भेट घेतली. आपल्या गावात जन्मलेली व्यक्ती देशाची राष्ट्रपतीपदी विराजमान असल्याचा आनंद अवर्णनीय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या गावातील अनेकांनी व्यक्त केली.
कानपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था
राष्ट्रपतींच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर कानपूर रेल्वे स्थानक, राष्ट्रपतींचे जन्मगाव आणि वाटेत लागणारी स्थानके यांच्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. राष्ट्रपतींचा हा कित्येक वर्षांमधील पहिलाच रेल्वे प्रवास असल्याने प्रशासनाने पूर्ण दक्षता बाळगली होती. राष्ट्रपती कोविंद आज शनिवारी परतत आहेत.
कलामांचा प्रवास दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी 2006 मध्ये रेल्वेप्रवास केला होता. त्यांनी एका विशेष रेल्वेगाडीतून दिल्ली ते डेहराडून असा प्रवास डेहराडून येथे भारतीय सेना अकादमीच्या निरोप सभारंभात भाग घेण्यासाठी त्यांनी केला होता. राष्ट्रपतींनी रेल्वे प्रवास करणे ही दुर्मिळ घटना असल्याने ती चर्चेचा विषय बनली.