बेळगावात पडसाद, वाहनांवर दगडफेक, संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना, पोलिसांचे पथसंचलन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर या घटनेचे पडसाद सीमाभागात उमटले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून सीमाभागात धरणे आंदोलन, दगडफेक, वाहने पेटविण्याचा प्रयत्न आदी घटना घडल्या आहेत. दगडफेकीत पोलीस व सरकारी वाहनांसह 15 हून अधिक वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. संतप्त जमावाने काही आस्थापनांवरही दगडफेक केली आहे. या प्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 20 डिसेंबरच्या सकाळी 6 पर्यंत बेळगावात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी 27 जणांना अटक केली असून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री सदाशिवनगर-बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान केल्याची घटना घडली. या घटनेचे छायाचित्र व क्हिडीओ शुक्रवारी सायंकाळपासून सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सीमाभागात तणाव वाढला. महाराजांचा अवमान करणाऱया माथेफिरुंवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी दीड हजारहून अधिक शिवप्रेमींनी शुक्रवारी रात्री धर्मवीर संभाजी चौक परिसरात ठाण मांडले.
त्यानंतर अप्रिय घटनांची मालिकाच सुरू झाली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ठाण मांडलेल्या शिवभक्तांना हटविण्यात आले. तत्पूर्वी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आदी वरि÷ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ‘तुमचे म्हणणे लेखी स्वरुपात द्या’ असे पोलीस अधिकाऱयांनी शिवभक्तांना सांगितले. ‘आम्ही शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत’, असे त्यांनी पोलीस अधिकाऱयांना सांगितले.
धर्मवीर संभाजी चौक परिसरातून गर्दी हटल्यानंतर अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. वाहने, आस्थापनांवर दगडफेक करण्यात आली. रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, शिवाजी रोड, कपिलेश्वर रोड परिसरात पोलीस, नागरिक व विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी आलेल्या सचिवालयाची वाहने फोडण्यात आली. कपिलेश्वर रोडवरील एका हॉटेलसमोर लावण्यात आलेले पोलीस वाहन पेटविण्याचाही प्रयत्न झाला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने आग विझविण्यात आली.
मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हे प्रकार सुरू होते. त्यानंतर बंदोबस्त वाढविण्यात आला. खडेबाजार, मार्केट, कॅम्प पोलीस स्थानकात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून शुभम शेळके, रमाकांत कोंडुसकर, अंकुश केसरकर यांच्यासह 27 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद शनिवारी सकाळीही उमटले. अनगोळ परिसरात संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची समाजकंटकांनी विटंबना केली. बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्यासाठी अत्यंत नियोजनबद्धपणे पुतळय़ांची विटंबना करण्यात आल्याचा संशय आहे.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके या प्रकरणांची चौकशी करीत आहेत. अप्रिय घटना घडू नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासून सोमवार दि. 20 डिसेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी डॉ. के. त्यागराजन यांनी बेळगाव शहर व तालुक्मयात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव तालुक्मयातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. ग्रामीण भागातही बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. बेळगावच्या शांततेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, असा संदेश देण्यासाठी पोलिसांचे हे शक्तिप्रदर्शन होते. दरम्यान, दगडफेक करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरून संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अटकसत्र सुरूच राहणार असल्याची माहिती वरि÷ अधिकाऱयांनी दिली.
सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर त्याआधी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बेळगावसह वेगवेगळय़ा जिल्हय़ातून जादा कुमक मागविण्यात आली आहे. सध्या अधिवेशन बंदोबस्तासाठी तब्बल 4 हजार पोलीस व अधिकारी बेळगावात आहेत. तणावाची स्थिती लक्षात घेऊन जादा कुमक मागविण्यात आली आहे. या मुद्दय़ावर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
शांततेचे आवाहन
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बेळगावकरांना शांततेचे आवाहन केले आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या दगडफेकीच्या घटनेसंबंधी धरपकड करण्यात आली आहे. शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोशल मिडियावर अफवा पसरविणाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा व्यक्तींविरुद्ध पोलिसांना माहिती द्यावी आणि शांतता पाळावी, असे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे.
पुतळा विटंबनेमागे षड्यंत्र
अनगोळ येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना करण्यात आली आहे. बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्यासाठी समाजकंटकांनी एक षड्यंत्राचा भाग म्हणून पुतळय़ाची विटंबना केल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेनेही तपास करीत आहेत. राष्ट्रपुरुषांच्या पुतळय़ांची विटंबना करून शांत बेळगावच्या प्रतिमेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. काही संघटना यामध्ये सक्रिय आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.