आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिलेली माहिती : येत्या निवडणुकीत युती आवश्यक
प्रतिनिधी /मडगाव
येत्या निवडणुकीसाठी युती करण्याची आवश्यकता असून राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा काँग्रेसकडे मागितल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी दिली. नाही तर सर्व 40 जागा लढविण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
वार्का येथील आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच प्रफुल्ल पटेल यांच्याशी तीन महिन्याभरापूर्वी काँगेसच्या नेत्यांनी बोलणी केली होती व सरकार स्थापन करण्यासाठी यावेळच्या निवडणुकांत युतीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस आमदार नसलेल्या मतदारसंघांची मागणी
आम्ही काँग्रेसचे आमदार नसलेले 8 मतदारसंघ मागितले आहेत. वेळ्ळीत वा नुवेत काँग्रेस नव्हे, भाजप आमदार आहेत, असे ते म्हणाले. यावेळी पत्रकारांनी काँगेस सोडून भाजपात गेलेल्या आमदारांना आपण तिकिटे देणार काय आणि त्यासाठी या 8 जागा मागत आहात काय, सदर आमदारांनी तिकिटासाठी राष्ट्रवादीशी संपर्क साधला आहे काय असे प्रश्न केले असता आलेमाव म्हणाले की, आपण काँग्रेसचे आमदार असलेल्या जागा मागत नाही. पण तिकिटे कोणाला देणार ही रणनीती घोषित करण्याची ही वेळ नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
…तर नावेलीतून लढण्यास वालंका सज्ज
नावेलीत काँग्रेसचा आमदार आहे, तो मतदारसंघ आम्ही मागत नाही, असे ते म्हणाले. तरीही युती प्रत्यक्षात येत नसल्यास चाळीसही जागा लढवाव्या लागतील. तसे झाल्यास नावेलीतून लढण्यास वालंका आलेमाव सज्ज असल्याचे संकेत त्यांनी दिले.
सिद्धी नाईक प्रकरण सीबीआयकडे द्यावे
दरम्यान, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण सुटण्यास विलंब होत असून यासंदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी सदर प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सीबीआयकडे सुपूर्द करावे, अशी मागणी आलेमाव यांनी उचलून धरली. हे दुसरे स्कार्लेट प्रकरण होऊ देऊ नका. सदर युवती गोमंतकीय असल्याने तिला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणी आपण सर्वप्रथम आवाज उठविला होता. निर्वस्त्र अवस्थेत कोणी आत्महत्या करत नसतो. हा खूनच असण्याची जास्त शक्मयता असून यामागे मोठी धेंडे आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी आवश्यक आहे, असे ते म्हणाले.