प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा सोबत आहे. पुढेही राहणार आहे. ज्या ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी कमी असेल तिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देवून पक्ष बळकट करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा होता आणि राहणार आहे, असे परखडपणे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
वर्धापनदिनानिमित्ताने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनली पोळ, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा समिंद्राताई जाधव, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, युवा नेते तेजस शिंदे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, जयश्री पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्व. यशवंतराव चव्हाण, किसनवीर आबा यांच्या पुतळयास अभिवादन करुन राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात ध्वजवंदना करण्यात आली. कार्यकर्त्यांनी सामुहिक राष्ट्रवादी काँग्रेसची प्रार्थना सादर केली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन केल्यानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. सायंकाळीपर्यंत रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिह्यात आणखी बळकट करु, असा विश्वास दिला.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारसाहेबांच्या विचारावर चालणारा हा जिल्हा आहे. जिह्यातली जनता राष्ट्रवादीच्या विचारावर प्रेम करते आणि तशीच प्रेम करत राहिल. जिह्यातल्या कष्टकरी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव कटिबद्ध आहे. आज कोरोनाच्या लढय़ातही रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्याचे ओळखून राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबिरासारखा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. सामाजिक कार्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.