राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा भाजपचा एककलमी कार्यक्रम, तिन्ही पक्ष भीक घालणार नाहीत
प्रतिनिधी/सांगली
राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. गत निवडणुकीत संकटात असतानाही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला चांगले यश मिळाले. राष्ट्रवादीची वाढती ताकद भाजपला खुपत आहे. त्यामुळेच अशाप्रकारे चौकशी यंत्रणांचा गैरवापर करून राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा भाजपकडून एलकलमी कार्यक्रम सुरु असल्याची टीका पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केली. कशामुळे, कशासाठी चाललं आहे? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. जर कुणी सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्याला तिन्ही पक्ष भीक घालणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर सीबीआयने छापे टाकले याबाबत विचारले असता ते म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते.
या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडल्याचे ऐकिवात नाही. जर कोणीतरी तक्रार करतय, कुणीतरी पैसे मागितले या विधानावर अवलंबून लोक कोर्टात जातात आणि न्यायालयाने असे आदेश देते इथंपर्यत ठीक आहे. पण तुम्ही निष्कर्ष काढला, काय म्हणायचं आणि त्यात कोण काय म्हणाले. अनिल देशमुख यांना अटकाव करणे अजून पैशाची देवाण-घेवाण झालेलीच नाही. पाकिस्तानने भारताला मदत मागितली. मात्र ती अजून द्यायचीच आहे असा हा प्रकार आहे. या गोष्टीवर अशा पद्धतीने इतक्या टोकाशी कारवाई करण्यापेक्षा देशात असे अनेक गुन्हे आहेत. भारतीय जनता पक्षाच्या बाजूच्या अशी अनेक नेते आहेत, की ज्यांच्यावर सिरीयस गुन्हे आहेत. पण दुर्दैवाने त्यावर काही होत नाही.
देशात आता न्याय राहिलेला नाही. न्याय करण्यासाठी यंत्रणा, एजन्सी याचा गैरवापर करण्याची पद्धत सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला कशामुळे कशासाठी चाललंय आहे. हे जनतेला माहिती आहे. आमचं सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील तर मी आपल्या तिन्ही पक्ष त्यांना भीक घालणार नाही, असेही ते म्हणाले.