पुणे \ ऑनलाईन टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचे विधान केलं होतं. राज ठाकरेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. लोकं काहीतरी बोलून जातात त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक घेतली होती या बैठकी नंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असल्याचा आरोप केल्याबाबत प्रश्न विचारला गेला. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत. हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्त्व देण्याचं कारण नाही अशा शब्दात राज ठाकरेंचं नाव न घेता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे” असा सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.