पालकमंत्री जयंत पाटील यांचे आमदार अनिल बाबर यांना जाहीर निमंत्रण
प्रतिनिधी / विटा
करेक्ट कार्यक्रम एवढ्यासाठीच, की तुम्ही आमच्या पक्षात परत यावे, असे जाहीर आमंत्रण आमदार अनिल बाबर यांना देत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या आमदार बाबर यांना पुन्हा परतण्याचे आवाहन केले.
टेंभू योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील कचरेवाडी कालव्याचा शुभारंभ आणि खानापूर तालुक्यातील वासंबे येथे चव्हाण-देशमुख बंधूनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बांधलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण अशा संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित आमदार अनिल बाबर यांना राष्ट्रवादी प्रवेशाची खुले आमंत्रण दिले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष ऍड बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंत्री जयंत पाटील यांना उद्देशून साहेब, मी जरा स्पष्ट बोलतो. कदाचित संध्याकाळी भाऊ घरात घेणार नाहीत. पण दररोज राष्ट्रवादीकडून जत आणि खानापूर तालुका टार्गेट करणार असल्याचे ऐकत असतो. तुम्ही करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे ऐकून आम्हालाही जोराने पळावे लागते. मात्र आम्ही तुम्हाला टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचा कार्यक्रम करा असे आवाहन करतो. त्यामुळे आमदार अनिलभाऊंनी पाहिलेले पाण्याचे स्वप्न पूर्ण होईल आणि शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. सुहास बाबर यांच्या टोळेबाजीनंतर आमदार अनिल बाबर यांनीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे अभ्यासू आणि अभियंता असणारे मंत्री आहेत त्यांनी टेंभू योजनेचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणी करावी आणि महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी उपसा जलसिंचन योजना होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. सुहास आडवळणाने बोलला, पण मी थेट सांगतो, साहेब करेक्ट कार्यक्रमच करायचा असेल, तर टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचा करा. त्यामुळे तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. त्यानंतर तुम्हाला जो कार्यक्रम करायचा तो करा, असे सांगत पाण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम तुम्ही पक्षात यावे म्हणून सुरू आहे. त्यासाठी थोडीफार बाजूबाजूने फिल्डिंग तर लावावीच लागणार ना? असे म्हणत, आपला माणूस आपल्या पक्षातून बाजूला केल्यानंतर दुःख तर होणारच. त्यामुळे तुम्ही पक्षात परत यावे, यासाठीच करेक्ट कार्यक्रम असल्याचे सुचवित आमदार अनिल बाबर यांना पक्ष प्रवेशाचे थेट निमंत्रण देऊन टाकले. उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. वासंबेतील या कार्यक्रमात आमदार बाबर पितापुत्रांनी केलेली टोलेबाजी आणि त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेले आमंत्रण यामुळे करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार , याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.