प्रतिनिधी/ रत्नागिरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष आणि मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना मयेकर यांचे कोल्हापूर येथे शुक्रवारी निधन झाले. रत्नागिरीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अजातशत्रू व्यक्तीमत्व नाना यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नाना मयेकर याना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरूवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने रात्री कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. काँग्रेसी विचारांचे दिलीप मुरारी उर्फ नाना मयेकर हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर नाना मयेकर यांनी रत्नागिरीचे तालुकाध्यक्षपद स्वीकारून संपूर्ण तालुका राष्ट्रवादीमय केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसला 2004 मध्ये विधानसभेमध्ये भाजपच्या मतदार संघात यश मिळाले होते. मात्र त्यानंतर पक्षांतर्गत घडामोडीतून ते काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. काँग्रेसमध्येही तालुकाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मधल्या काळात ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र नुकताच त्यांनी स्वगृही राष्ट्रवादीत प्रवेश करून पुन्हा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद स्वीकारून महिनाभरातच नानांना कोरोनाची लागण झाली व अवघ्या काही दिवसातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याने साऱयांनाच धक्का बसला. दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या नाना यांनी मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मालगुंड परिसरातील अनेक मुलांना शिक्षणाची संधी दिली होती. त्यांचे सामाजिक योगदानही मोठे होते. नानांच्या निधनाने राष्ट्रवादीसह रत्नागिरीतील राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात न भरून येणारी पोकळी: सामंत
आज अचानक माझ्या पीएचा निरोप आला की, नाना मयेकरांचे निधन झाले. या बातमीवर विश्वासच बसेना. चार दिवसापूर्वी नानांचा मुलगा रोहितशी नानांची चौकशी केली. सगळं ठीक असल्याचं कळलं. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नानांच्या साक्षीनं झाली. मी युवा अध्यक्ष झाल्यावर त्यांनी केलेला सत्कार आज डोळ्यासमोर उभा राहिला. अधिकारवाणीने नानांच चिडणं आता कधीच बघता व अनुभवता येणार नाही. राजकारणातील खेळकर वृत्ती त्यांच्याकडून शिकण्याजोगी होती. त्यांची विकासाची स्वप्ने पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
ग्रामीण विद्यार्थ्याचा सुजाण पालक गेला: ऍड.पाटणे मालगुंडमधील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते, मध्यवर्ती बँकेंचे संचालक आणि एक उमदा, दिलखूलास माणूस दिलीप उर्फ नाना मयेकर यानी आज अखेरचा श्वास घेतला, ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांची धडपड असे. संघर्षशील नेता, धडपणारा कार्यकर्ता व समाजभिमुख दृष्टी यामुळे त्यांचं बहुआयामी व्यक्तीमत्व विकसित झाल. नानांच्या जाण्याने एक क्रीडाप्रेमी, उमदा, हसरा मित्र, ग्रामीण विद्यार्थ्यांचा सुजाण पालक गेला, अशी प्रतिक्रिया ऍड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली.