हजार रुपये मानधन घेणारी आशा राबतेय : आरोग्य, पोलीस, महसूल प्रंटवर लढताहेत : लाखो रुपये घेणारी शिक्षक जमात घरात
चंद्रकांत देवरुखकर / सातारा
कोरोना व्हायरस जगामध्ये हाहाकार माजवत आहे. आपल्या देशातील स्थिती हळूहळू गंभीर होवू पहात आहे. यामध्ये प्रारंभीपासून पोलीस, आरोग्य विभाग, महसूल विभाग प्रंटवर लढत आहे. त्यांना आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत. सध्या कोरोना संसर्ग साखळी तुटणे अत्यंत महत्वाचे असून शासन त्यादृष्टीने प्रचंड मेहनत घेत आहे. मात्र, दुसरीकडे या लढय़ात सर्व शासकीय कर्मचाऱयांचा सहभाग अपेक्षित असताना काहीजण कागदावरच उडय़ा मारत आहेत. तर एक हजार रुपये मानधन घेणारी आशा वर्कर भर उन्हात सर्व्हेच्या कामात कोणत्याही अपेक्षेविना कार्यरत असताना हजारो लाखो रुपये वेतन घेणारे प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक मंडळी मात्र घरात बसून राहिल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
कोरोना विरुध्दच्या लढाईत रस्त्यावर प्रारंभीपासून लोकांचा रोष अंगावर ओढावून घेत लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र झटले आहे व सध्याही झटत आहे. त्यांच्या मदतीला आता होमगार्डही आले आहेत. दिवसरात्र 12 12 तास डय़ुटी करताना स्वतःच्या घरादाराची काळजी न करता लोकांना घरात बसा सांगणाऱया पोलिसांवर हल्लेही होत आहेत. नागरिक कोरोनाच्या संकटापासून दूर रहावेत यासाठी झटत असलेल्या पोलीस दलावरील हल्ले करणाऱयांना काळ कधीच माफ करणार नाही.
सातारा जिल्हय़ात कोरोनाग्रस्त आढळून आल्यापासून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयासह कृष्णा रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचाऱयांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे तीन रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळालेले आहे. आता जावली व कराड तालुके हॉटस्पॉट बनू लागल्याने प्रशासनाला सर्व ताकद तिकडे वळवावी लागली आहे. कराड तर 100 टक्के लॉकडाऊन केले आहे. मात्र त्यात सुध्दा देतील नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अगदी वीज कर्मचाऱयांपासून, पाणी सोडणारे कर्मचारी, महसूल कर्मचारी झटत आहेत.
संपूर्ण देश व जग कोरोना विरुध्द लढाईत सहभागी झाले आहे. या लढाईच्या पहिल्या फळीत डॉक्टर्स, नर्स, पोलीस, स्वछता कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, वीज कर्मचारी, महसूल कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी हे सर्व आपापले परीने कोणत्याही विशेष सुविधा नसताना काम करत आहेत.
चौकट
यांच्या योगदानाची किंमत झाली पाहिजे
महसूल विभागासह अन्य कर्मचारी यांना कोरोना लढय़ात कोणतेही विमा कवच तर नाहीच शिवाय अन्य सुरक्षा साधनेही नाहीत. तरीही हे विभाग कोणतीही अडचण न सांगता आपले काम करत आहेत तर जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आपले नुकसान सोसूनही सर्वानी अन्न धान्य पुरवण्याचे आपले कर्तव्य पार पाडत आहे. यामध्ये खास करून अंगणवाडी सेविका, आशा सेविका कोणत्याही साधना शिवाय अत्यल्प मानधनात सकाळी सात वाजले पासून ते तळपत्या उन्हात घरोघर फिरून सर्वेक्षणाचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. काही ठिकाणी सामाजिक रोषालाही त्याना सामोरे जावे लागत आहे.
चौकट
शिक्षण विभाग लढाईतून लुप्तच
मात्र शासनाचा एक महत्वाचा विभाग सोडून सर्वजण खारीचा वाटा उचलत आहेत. शासनात संघटित व उच्च वेतन श्रेणी असलेला शासनाची सर्वाधिक कर्मचारी संख्या असलेला विभाग म्हणजे शिक्षण विभाग. या लढाईत कुठेच दिसत नाही. संघटनेच्या जोरावर प्रत्येक वेळी निवडणूक, जनगणना या सारख्या राष्ट्रीय कामातून पळ काढण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात तरी या राष्ट्रकार्यात सहभागी होणार का? या लढाईमध्ये शिक्षकांनी स्वतःहून पुढे येऊन काम करण्याची मागणी करणे अपेक्षित होते.
चौकट
सर्व्हे व जनजागृतीचे काम चांगले झाले असते
सर्वाधिक वेतन घेणारे (50 हजार ते 4 लाख) शिक्षक मग ते प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक असोत यांच्या योगदानाचा विचार समाज करु लागला आहे. अशा उच्च पगारी लोकांना मोकळे सोडून शासनाने 500 /1000 रुपये मानधन घेणारे अल्पशिक्षित अशा अंगणवाडी व आशा सेविकांना सर्वेक्षणाचे काम दिले आहे ते अन्यायकारकच आहे. कदाचित हेच काम मोठय़ा संख्येने उपलब्ध असलेल्या शिक्षकांकडून करून घेतल्यास त्याचा दर्जा ही चांगला राहील व उच्च शिक्षित असल्यामुळे कोरोनाविषयक जनजागृती त्यांनी चांगली केली असती.
चौकट
ग्राम दक्षता समिती कागदावरच
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून त्या अनुषंगाने गावपातळीवर लढा देताना समन्यवयासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सध्या ग्राम दक्षता समिती निर्माण करण्यात आल्या आहेत. यामध्ये सरपंच, उपसरपंचांसह सर्व सदस्य, ग्रामसेवक, दोन शिक्षक, दोन वकील, पत्रकार, कृषी अधिकारी, निवृत्त सैनिक आदींचा समावेश आहे. मात्र सध्याच्या लढाईत या ग्रामदक्षता समिती फक्त कागदावरच काम करत आहेत. या समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱयांनी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.