वृत्तसंस्था / मुंबई
2021 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआयने) संलग्न असलेल्या विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनाबरोबर चर्चा करत स्पर्धा कार्यक्रम निश्चित करण्याचे ठरविले आहे. दरम्यान बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट हंगामाचा नवा आराखडा तयार केला आहे. मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धा 20 डिसेंबरपासून तर रणजी क्रिकेट स्पर्धा 11 जानेवारीपासून खेळविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
बीसीसीआयतर्फे विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनांना लेखी पत्राद्वारे या क्रिकेट स्पर्धा संदर्भात सूचना दिल्या असून त्यानुसार चार पर्याय ठेवण्यात आले आहेत. मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धा 20 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान घेतली जाईल. या स्पर्धेसाठी 22 दिवसांचा कालावधी जरूरीचा आहे. त्यानंतर विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा घेण्याचे ठरविले तर ही स्पर्धा 11 जानेवारी ते 7 फेब्रुवारी अशा 28 दिवसांच्या कालावधीत घेतली जाईल. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 67 दिवसांचा कालावधी जरूरीचा असून ही स्पर्धा 11 जानेवारी ते 18 मार्च दरम्यान घेतली जाईल. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भरवितेवेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन केले जाईल. जैवसुरक्षित वातावरणातच या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातील. राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी होणारे 38 संघ पाच इलाईट गटात तसेच एक प्लेट गटात विभागाले जातील. त्यानुसार इलाईट गटात सहा तर प्लेट गटात आठ संघ राहतील.