वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारी समस्येमुळे अगोदरच विलंब झालेल्या देशातील राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. 2021 च्या क्रिकेट हंगामाला सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग स्पर्धेने प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा म्हणजे आगामी आयपीएल स्पर्धेसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलाव प्रक्रियेचे प्रमुख व्यासपीठ ठरणार आहे.
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग स्पर्धा 10 ते 31 जानेवारी दरम्यान देशातील सहा विविध शहरामध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत अनुभवी शिखर धवन, सुरेश रैना आणि इशांत शर्मा हे प्रमुख आकर्षण असले तरी केरळच्या एस. श्रीशांतच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2013 साली आयपीएल स्पर्धेत आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्याने बंदी घालण्यात आलेल्या एस. श्रीशांतचा या स्पर्धेसाठी केरळ संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. 37 वर्षीय श्रीशांतचे क्रिकेट क्षेत्रात पुनरागमन होत आहे. त्याच्या बंदीचा कालावधी समाप्त झाला असून तो पुन्हा भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2021 च्या आयपीएल स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला आहे. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत नवोदित क्रिकेटपटू चांगली कामगिरी करत निवड समिती व प्रँचायजींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. अलिकडे बीसीसीआयची नवी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी देशातील नवोदित खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती सदस्यांचे या स्पर्धेवेळी लक्ष राहील.
रविवारपासून सुरू होणारी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा देशातील सहा शहरामध्ये जैविक सुरक्षेच्या सुविधासह खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले संघ सहा गटात विभागले गेले असून त्यापैकी पाच इलाईट आणि एक प्लेट असे गट करण्यात आले आहे. या स्पर्धेतील साखळी टप्प्यापर्यंतचे सामने मुंबई, बडोदा, इंदोर, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळूरमध्ये होणार असून त्यानंतर बाद फेरीचे सामने अहमदाबादमध्ये खेळविले जातील. या स्पर्धेत सहभागी होणारे नवोदित युवा क्रिकेटपटू ऋgतुराज गायकवाड, प्रियम गर्ग, जैस्वाल, शिवम दुबे, सर्फराज खान, साई किशोर, एन. सिद्धार्थ यांच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष राहील.
दुखापतीमुळे क्रिकेटपासून अलिप्त राहिलेला इशांत शर्माचे या स्पर्धेत पुनरागमन होत आहे. दिल्ली संघामध्ये इशांत शर्मा आणि शिखर धवन हे प्रमुख खेळाडू आहेत. उत्तरप्रदेश संघामध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आपली तंदुरूस्ती राखण्यासाठी प्रयत्न करेल. उत्तरप्रदेश संघामध्ये अनुभवी सुरेश रैनाचाही समावेश आहे. मुंबईचा सुर्यकुमार यादव दर्जेदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत मुंबई संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करत आहेत. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची मुंबईच्या वरिष्ठ संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. कर्नाटकाचा संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे.
इलाईट गट अ- जम्मु-काश्मीर, कर्नाटक, पंजाब, उत्तरप्रदेश, रेल्वे, त्रिपुरा, सर्व सामने बेंगळूरमध्ये
इलाईट गट ब- ओदिशा, बंगाल, झारखंड, तामिळनाडू, आसाम, हैद्राबाद, सर्व सामने कोलकातामध्ये
इलाईट गट क- गुजराथ, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश, बडोदा, उत्तराखंड, सर्व सामने बडोद्यात
इलाईट गट ड- सेनादल, सौराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा, सर्व सामने इंदोरमध्ये
इलाईट गट ई- हरियाणा, आंाध्रप्रदेश, दिल्ली, मुंबई, केरळ, पाँडेचेरी, सर्व सामने मुंबई
प्लेट गट- चंदीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, सर्व सामने चेन्नईत.