वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडू व प्रशिक्षकांचे विक्रमी अर्ज दाखल झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यान चंद पुरस्कारांसाठी तब्बल सहाशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
मागील वर्षी या पुरस्कारांसही 400 हून अधिक अर्ज दाखल झाले होते, तो विक्रम यावेळी मागे पडला आहे. क्रीडा मंत्रालयाचे पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱयांनी अर्जांची छाननी सुरू केली असून त्यांच्याकडून शिफारस झालेल्या खेळाडूंची यादी पुरस्कार निवड समितीकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश मुकुंदकुम शर्मा हे या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आहेत.
मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारासाठी यावर्षी एकूण 35 जणांनी अर्ज पाठविले असून फक्त दोघांनाच हा पुरस्कार देण्याची मर्यादा क्रीडा मंत्रालयाने घालून दिली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी 215 अर्ज दाखल झाले असून 15 क्रीडापटूंना त्यासाठी निवडले जाईल. त्याचप्रमाणे द्रोणाचार्य जीवनगौरवसाठीही मंत्रालयाकडे विक्रमी शंभरहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. द्रोणाचार्यच्या नियमित पुरस्कारासाठी 48 तर ध्यान चंद जीवनगौरवसाठी 138 अर्ज मिळाले आहेत. प्रतिवर्षी 29 ऑगस्टला क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाते. पण यावेळी ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेनंतर खेळाडूंची निवड करून पुरस्कार देण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला होता.