नव्या कृषी कायद्यांना विरोध, राज्याला जोडणारे सर्व महामार्ग बंद करून चक्काजाम आंदोलन
प्रतिनिधी/ बेंगळूर
नव्या कृषी कायद्यांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत विविध शेतकरी संघटनांनी शनिवारी चक्काजामची हाक दिली होती. त्यानुसार राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी सर्वत्र चक्काजाम आंदोलन केले. शनिवारी दुपारी 12 ते 3 पर्यंत राज्याला जोडणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग बंद करून चक्काजाम आंदोलन छेडले. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. परिणामी, महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचेही पहावयास मिळले.
प्रामुख्याने पुणे-बेंगळूर, म्हैसूर-बेंगळूर, बेंगळूर-चिक्कबळ्ळापूरसह बेंगळूरला जोडणारे सर्वच रस्ते रोखून शेतकऱयांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात आक्रोश व्यक्त केला. यावेळी शेतकऱयांनी महामार्गावर रोपे लावत आंदोलन छेडले होते. तसेच केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली. बेंगळूरच्या यलहंकाजवळ राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष व शेतकरी नेते शांतकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना अटक करून ताब्यात घेतले.
चामराजनगर येथे दंडवत घालून आक्रोश
कोलार तालुक्यातील वडगुरु येथे पोलीस व आंदोलकांमध्ये वादावादी झाली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर तात्काळ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रामनगरच्या आरएमसी यार्डजवळ 100 पेक्षा अधिक शेतकऱयांनी आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात विविध घोषणा दिल्या. देवनहळ्ळी जवळील महामार्ग बंद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर चामराजनगर येथे दंडवत घालून केंद्र सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला.
राज्यातील बहुतांश जिल्हय़ांमध्ये आंदोलन
नेलमंगलच्या मादावरजवळ शेतकऱयांनी महामार्ग रोखून आंदोलन केले. म्हैसूर, चामराजनगर, रामनगर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, तुमकूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, शिमोगा, चिक्कमंगळूर, बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, बागलकोट, यादगिरी, विजापूर, बिदर, गुलबर्गा, बेळगाव, धारवाडसह सर्वच जिल्हय़ांमध्ये शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आंदोलन छेडले. गदग जिल्हय़ातील टिप्पू सुल्तान सर्कल, धारवाड येथील रम्या रेसिडेन्सी रस्ता, बागलकोट, हुबळी-धारवाड, बळ्ळारीत तीन ठिकाणी रास्तारोको करण्यात आला होता. यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे आढळून आले. तसेच काहीकाळ काही मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचेही पहावयास मिळाले.