कराड
काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने येत्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जावे, अशी विचारधारा आमच्यात आहे. त्यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या आघाडीबाबत अजून चर्चा सुरू झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार शरद पवार यांनी रविवारी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, सहय़ाद्रि कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांची उपस्थिती होती.
अलिकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी देशातील विविध राज्यातील अनेक जणांवर कारवाई केली आहे. काही लोकांना अटक करून त्यांच्यावर खटले दाखल केले, परंतु त्यातील काही जण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे देऊन फेरविचार करण्याची विनंती पत्रात केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी इन्साफ के सिपाही हे अभियान सुरू केले आहे. त्यांच्याशी आमचा सुसंवाद आहे. केंद्र सरकारचे सत्तेचा आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणे हे सद्याच्या सरकारचे धोरण आहे. या धोरणास विरोध करण्याची विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा आहे. त्यांच्याशी सिब्बल यांच्या या अभियानाबाबत बोलणार आहे. अनेक ठिकाणी राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा मुद्दाही पत्रात नमूद करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्यांमध्ये राज्यपालांमुळे तेढ निर्माण होत असल्याची बाब पत्राद्वारे मोदींच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकांबाबत सध्या तरी आम्ही मतदार संघनिहाय आढावा घेतलेला नाही. पण तो घ्यावा लागणार आहे. भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला असल्याबाबत विचारले असता ‘कोण तयारीत आहे, हे निवडणूक निकालातून दिसले आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
तक्रारदारच जज झाले तर कसे होईल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यासाठी ज्या लोकांनी समिती नेमली आहे. त्यात राऊत यांना अटक करण्याची मागणी करणारांनाच त्या समितीत घेतले आहे. एखाद्याने तक्रार केली असेल आणि तक्रार करणाऱया व्यक्तीलाच जज म्हणून नेमले तर त्याचा निकाल कसा लागेल, असा उपरोधिक सवाल शरद पवार यांनी केला.