जिल्हाध्यक्ष संदेश कचरे यांच्यासह 18 पदाधिकाऱ्यांचा समावेश
कोल्हापूर प्रतिनिधी
पक्षाकडून कोणतीही राजकिय ठोस भूमिका न घेणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ खच्चीकरण करणे, संघटनात्मक धोरणाचा अभाव, वरिष्ठ पातळीवरुन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी असलेला संवादाचा अभाव, आदी कारणांमुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, शहराध्यक्ष सचिन जाधव, अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सलीम पटवेगार यांच्यासह जिह्यातील 18 पदाधिकार्यांनी शुक्रवारी सामुहिक राजीनामे देत पक्षाला रामराम केला. राजीमान्याचे पत्र प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांना पाठविले आहे.
पक्षाच्या लक्ष्मीपुरी येथील कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम पटवेगार होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग सुतार, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा भारती पाटील आदींची होती.
बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रदेशपातळीवरील ध्येय धोरण व कार्यपध्दतीबद्दल तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. गेल्या पाच वर्षातील पक्षाची राजकीय भूमिका, संघटनात्मक धोरण, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी असलेला विसंवाद व प्रदेश पातळीवरील नियोजनशून्य कारभारावर टीका करत आक्रमक भूमिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडल्या. संघटना व संघटनात्मक विस्तार यासाठी प्रदेश पातळीवरुन जिल्हा पदाधिकार्यांना कोणत्याही प्रकारचे दुर्देवाने पाठबळ मिळाले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पक्षाचा विस्तार करुनही पक्षाच्या प्रदेश पातळीवरुन योग्य ती दखल घेतली गेली नाही. याबद्दल कार्यकर्त्यांनी खंतही व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्यांच्या भावनांचा व दबावाचा विचार करुन पक्षाचा सामुहिक राजिनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय व संघटनात्मक भूमिका लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकावर जिल्हाध्यक्ष संदेश कचरे, शहराध्यक्ष सचिन जाधव, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खोंद्रे यांच्या सह्या आहेत.