वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम/
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत के. एल. राहुलच्या चिवट आणि समयोचित नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी उपाहारापर्यंत 5 बाद 193 धावा जमवित इंग्लंडवर 10 धावांची नाममात्र आघाडी मिळविली होती. यावेळी राहुल 78 तर जडेजा 27 धावांवर खेळत होते.
या कसोटीतील गुरुवारी खेळाच्या दुसऱया दिवशी पावसाच्या अडथळय़ामुळे बराच खेळ वाया गेला. रोहित शर्मा आणि राहुल यांनी भारताच्या डावाला चांगली सुरुवात करून दिल्यानंतर अँडरसन व रॉबिन्सन यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचे महत्त्वाचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची स्थिती दुसऱया दिवसाअखेर 4 बाद 125 अशी झाली होती. मात्र, एका बाजूने राहुलने चिवटपणे खेळत अर्धशतक नोंदविले. चहापानानंतर गुरुवारी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
शुक्रवारी भारताने 4 बाद 125 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. पण रॉबिन्सनने यष्टीरक्षक पंतला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. पंतने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. भारताने यावेळी 50 षटकात 5 बाद 145 धावांपर्यंत मजल मारली होती. पंत बाद झाल्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या अष्टपैलू रविंद्र जडेजाने राहुलला बऱयापैकी साथ दिली. राहुल आणि जडेजा यांनी उपाहारापर्यंत सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 48 धावांची भागिदारी केली होती. खेळाच्या पहिल्या सत्राअखेर राहुल 11 चौकारांसह 78 तर जडेजा 4 चौकारांसह 27 धावांवर खेळत होते. पहिल्या सत्रामध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांना माफक यश मिळाले. त्यांना भारताचा केवळ 1 गडी बाद करता आला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड- प. डाव 183, भारत- प. डाव 67.1 षटकात 5 बाद 193 (रोहित शर्मा 36, राहुल खेळत आहे 78, पुजारा 4, कोहली 0, रहाणे 5, पंत 25, जडेजा खेळत आहे 27, अँडरसन 2-34, रॉबिन्सन 2-55).
(धावफलक उपाहारापर्यंत)