नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील कोरोना स्थितीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील ट्वीट करत त्यांनी मोठी सरकारवर हल्ल चढवला आहे. ज्यामध्ये असे म्हटले की, जुलै आला आहे, मात्र कोरोना लस आली नाही.
राहुल गांधी यांनी हिंदी भाषेत ट्वीट करत म्हटले आहे की, जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं. म्हणजेच जुलै महिना आला आहे मात्र कोरोना लस मात्र आली नाही, असे म्हणत त्यांनी देशातील कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनीही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या भरपाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष्य केले होते. राहुल गांधींच्या या ट्विटनंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांना लसीवर क्षुद्र राजकारण करू नये असे आवाहन केले आहे.
राहुल गांधींच्या या लसीवरील ट्विटला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, मी कालच जुलै महिन्यात लस उपलब्ध झाल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधींची समस्या काय आहे? ते वाचत नाहीत का? त्यांना समजत नाही का? अहंकार आणि अज्ञानाच्या व्हायरसची कोणतीही लस नाही. काँग्रेसने आपल्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या हाताळणीवर लक्ष देण्याची गरज आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले आहे की, लसीचे 12 कोटी डोस जुलै महिन्यात उपलब्ध होतील जे खासगी रुग्णालयांच्या पुरवठ्यापेक्षा वेगळे आहेत. राज्यांना 15 दिवस अगोदर पुरवठ्याविषयी माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधींना समजले पाहिजे की कोरोनाविरूद्धच्या लढाईत गांभीर्याऐवजी क्षुद्र राजकारण करणे योग्य नाही.