वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वतंत्र मत्स्यपालन मंत्रालय स्थापन करण्याच्या विधानावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत चांगलेच सुनावले आहे. भारत सरकारच्या अधीन कुठले विभाग कार्यरत आहेत याची माहिती मिळावी म्हणून राहुल गांधींना एखाद्या शाळेत पाठविण्याची गरज असल्याचे गिरिराज यांनी म्हटले आहे.
देशात मत्स्यपालन क्षेत्रात चालना देण्याच्या प्रयत्नांवर भाजप खासदार सुनिता दुग्गल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल गिरिराज यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल यांनी 2 फेब्रुवारी रोजी लोकसभेत विभागाशी संबंधित प्रश्न विचारला आणि काही दिवसांनी हा विभाग काम करत असल्याचा त्यांना विसर पडला. त्यांची स्मरणशक्ती संपुष्टात आली आहे का हे माहित नाही, पुड्डुचेरी आणि कोचीमध्ये मत्स्यपालन विभागच नसल्याचे राहुल यांनी म्हटल्याने मला ठेच पोहोचल्याचे उद्गार केंद्रीय मंत्र्यांनी काढले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी देशातील मत्स्यपालन क्षेत्राला खराब स्थितीत ठेवण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 2014 मध्ये कित्येक पिढय़ांपर्यंत राज्य करणाऱयांनी केवळ 3,682 कोटी रुपयांचा निधी दिला होता. तर मोदी सरकारने केवळ 6 वर्षांमध्ये 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 1947 ते 2014 पर्यंत काँग्रेसच्या शासनात देशात केवळ 100 लाख टन मत्स्यउत्पादन झाले. तर मोदी सरकारच्या मागील 6 वर्षांमध्ये 150 लाख टन उत्पादन झाल्याचे गिरिराज म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्याला मत्स्यपालन विभाग कुठे आहे हेच माहित नाही. सद्यकाळात मत्स्यपालन क्षेत्राचा विकास 10.87 टक्क्यांच्या दराने होत आहे. काँग्रेसच्या काळात हा दर केवळ 5.27 टक्के होता. काँग्रेसच्या नेत्याला भारतात कोणकोणते विभाग कार्यरत आहेत हेच माहित नसल्याने त्यांना शाळेत पाठविण्यात यावे, असे गिरिराज यांनी स्वतःच्या खुमासदार शैलीत म्हटले आहे.