ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घ्यावीत यासाठीची मोर्चेबांधणी पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. राहुल गांधी उद्या जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीला संबोधित करणार आहेत. सध्या देशात बेरोजगारीची जी भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद तडकाफडकी सोडलं, त्यानंतर पुन्हा सोनिया गांधींना सूत्रं स्वीकारावी लागली. मात्र, आता राहुल गांधी यांनी पुन्हा सक्रीय व्हावं यासाठी पक्षाकडूनही वेगवेगळे कार्यक्रम आखल्याचं दिसतं आहे. उद्या म्हणजे 28 जानेवारीला ते जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीला संबोधित करणार आहेत, त्यानंतर 30 तारखेला ते केरळमध्येही सभा घेणार आहेत.
पुढच्या काही काळात त्यांचे वेगवेगळय़ा राज्यांमध्येही दौरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसमध्ये राहुल यांचं पुन्हा लाँचिंग करण्याच्याच दृष्टीनं या सगळय़ा हालचाली सुरु आहेत. राहुल गांधी ही अध्यक्षपदाची सूत्रं नेमकी कधी स्वीकारणार हे मात्र अद्याप निश्चित नाही.
तर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस या निवडणुका लढण्याची शक्यता आहे.