नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आता सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कोरोना काळात महागाईचा भडका उसळला आहे. तेलाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यावरून राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी, पीएम की बस मित्रों को जवाबदारी’. वाढत्या महागाईवरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
आयजीएलने सीएनजीच्या किंमतीत ९० पैसे प्रति किलो आणि पीएनजीच्या किंमत दिल्लीमध्ये १.२५ रुपये प्रति एससीएम वाढवली आहे. राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार देशातील कोरोना स्थिती असेल , बेरोजगारी आणि वाढती महागाई अशा मुद्दयावरून केंद्र सरकरावर निशाणा साधत असतात.