जायंट्स मेनतर्फे जलदिनानिमित्त व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
बाटलीबंद पाण्याच्या रिकाम्या बाटलीच्या पुनर्वापराने कर्करोगाचा धोका निर्माण होतो. ही बाटली वापरणे आरोग्याच्यादृष्टीने हितावह नाही, असा मौलिक सल्ला डॉ. प्रवीण घोरपडे यांनी दिला.
जागतिक जलदिनानिमित्त जायंट्स मेन आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. बेळगावसारख्या ठिकाणी अजून पाण्याची टंचाई म्हणावी तशी नसल्याने इथले नागरिक पाण्याविषयी फारसे जागरुक नसल्याचे जाणवते. पण भविष्यात पावसाचे प्रमाण कमी झाले तर टंचाईला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.
पाश्चात्य देशात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य केले जाते. टॉयलेट टूप म्हणजे शौचालय ते पिण्याच्या पाण्याचा नळ, अशी संकल्पना तेथे राबविली जाते. बेळगाव शहरातील सांडपाणी हे बळ्ळारी नाल्यातून वाहते. पण आजपर्यंत त्यावर प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त केली. यासाठी तुमच्यासारख्या संघटनांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा, असे सांगितले.
व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील, स्पे. कमिटी सदस्य मोहन कारेकर, सचिव विजय बनसूर होते. स्वागत आणि प्रास्ताविक युनिट संचालक मदन बामणे यांनी केले. डॉ. प्रवीण घोरपडे यांना संजय पाटील यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष संजय पाटील यांनी भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून पाणी जपून वापरावे, असे सांगितले. यावेळी बहुसंख्येने जायंट्स सभासद, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले. अविनाश पाटील यांनी आभार मानले.