कोरोनाच्या उदेकामुळे सर्वसामान्य माणसालाही पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणाचे मनमानी शोषण केल्यामुळेच हवामान बिघडले असून वेगवेगळय़ा जंतूंचे हल्ले मानवजातीवर होत आहेत, अशी लोकांची भावना झाली आहे. त्यामुळे अनेक कल्पक नागरिक वेगवेगळय़ा मार्गानी पर्यावरण संरक्षणाचा संदेश आपापल्यापरीने इतरांना देत आहेत.
विशेषतः राजधानी दिल्लीत तर हिवाळय़ाच्या सुरुवातीला प्रदूषणाची समस्या भयानक रूप धारण करते. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन यासारखा प्रभावी उपाय नाही, हे साऱयांनाच पटले आहे. दिल्लीतील एक रिक्षावाला राकेश याने आपल्या रिक्षातच छोटेखानी बगीचा तयार करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अनोखा उपाय केला आहे. रिक्षात ग्राहक बसण्याच्या जागेमागची जागा त्याने या बगीचासाठी वापरली आहे. तसेच कोपऱयांमध्येही छोटी झाडे लावून आल्हाददायक वातावरण बनविले आहे. मात्र, त्याने लावलेली झाडे दिखाऊ नाहीत. तर पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त अशी कोरफड, पांढरी मुसळी, चित्रक, फुलवारी, तुळस इत्यादी औषधी वनस्पती त्याने या रिक्षाबागेत लावल्या आहेत. या झाडांना ते सकाळी पाणी देतात. त्यांचे ग्राहकही या अनोख्या मार्गावर समाधानी आहेत. त्यांच्या रिक्षात बसल्यावर जणूकाही बागेत बसल्याचा अनुभव येतो, असे ते म्हणतात. ही कल्पना राकेश यांना अडीच वर्षापूर्वी सुचली होती. राकेश यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते पोलीस, सैनिक व डॉक्टरांना पाच किलोमीटर अंतरापर्यंत विनामूल्य प्रवाससेवा देतात.