प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील कोरोना प्रार्दुभावाची साखळी खंडीत करण्यासाठी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी 15 दिवसासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रूपयाची आर्थिंक मदत देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेबाबत रिक्षाचालकामध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्यातील 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना संचारबंदीच्या काळात 1500 रूपयाची आर्थिंक मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याचा फायदा शहर व जिल्हयातील रिक्षाचालकांना होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये ज्याच्या नावाने परवाना (परमिट) आहे, त्यांनाच ही आर्थिंक मदत मिळणार आहे.कोल्हापूर जिल्हयात सुमारे 30 हजार तर यापैकी शहरात 13 हजार परमिटधारक रिक्षाचालक असल्याचे सांगण्यात आले.
शहरात दुसऱ्याची रिक्षा चालवणाऱयांची संख्या मोठी आहे. तसेच दुसऱयाच्या परमिटवर रिक्षा घेणाराही एक वर्ग आहे. यापैकी स्वतःच्या परमिटवर रिक्षा आहेत त्यांना या आर्थिक मदतीचा फायदा होणार आहे. याबाबत कांही रिक्षा स्टॉपवरील रिक्षा चालकांची भेट घेऊन, या आर्थिक मदतीबाबत विचारण्यात आले. यावेळी रिक्षा चालकांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
आर्थिक मदत कशी मिळणार ?-आनंद परिते,रेस कोर्स मित्र मंडळ,रिक्षा स्टॉप
रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीबाबत संभ्रमावस्था आहे. ही मदत कोणाला,कशी व कोणत्या खात्Îाला जमा होणार ? याची सविस्तर माहीती उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
फक्त वृतपत्रात वाचले-सुरेश चिले,मिरजकर तिकटी रिक्षा स्टॉप
संचारबदीच्या काळात रिक्षा चालकांना 1500 रूपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा वृतपत्रात वाचली आहे. याची सविस्तर माहीती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्पष्ट व्हावी.
रिक्षा परमिटधारकांनाच ही मदत मिळणार-श्रीकांत भाट,मध्यवर्ती बसस्थानक स्टॉप
संचारबंदी काळात रिक्षा चालकांना 1500 रूपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा शासनाने जाहीर केली आहे. ही मदत ज्याच्या नावाने परमिट आहे,त्यांनाच मिळणार आहे.