बेळगाव / प्रतिनिधी
प्रवासी रिक्षा आणि वाळू वाहतूक करणाऱया ट्रकमध्ये झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले. बेळगाव- बागलकोट महामार्गावरील पाटीलनगर मुतगा येथे मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास हा अपघात घडला आहे. जखमींना उपचारासाठी सिव्हील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर प्रकृती गंभीर बनल्याने यापैकी चौघां जणांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
सदर रिक्षा बेळगावहून सांबरा विमानतळाकडे जात असताना रिक्षाचे समोरचे टायर फुटल्याने रिक्षा समोरून येणाऱया वाळू वाहतूक करणाऱया ट्रकला धडकली. यामुळे हा अपघात घडला यामध्ये रिक्षा चालक दशरथ दत्ता पाटील, शिवाजीनगर (वय 51) यांच्यासह रूद्रव्वा इराप्पा कंबार (वय 60), ऐश्वर्या पांडुरंग बळी (वय 20), सीमा पांडुरंग बळी (वय 40), पांडुरंग बाबू बळी (वय 50) आणि गणेश पांडुरंग बळी (वय 23) सर्वजण रा. गणेशपूर हे जखमी झाले आहेत.
गणेशपूर येथील बळी कुटुंबिय मंगळवारी बेळगावहून विमानाने तिरूपतीला जाण्यासाठी रिक्षातून सांबरा विमानतळाकडे जात असताना हा अपघात घडला. बेळगाव- बागलकोट महामार्गावरील मुतगाजवळ उतारतीस हा अपघात घडला आहे. सदर ट्रक बेळगावकडे येत असताना समोरून येणाऱया रिक्षाचे टायर फुटल्याने सदर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा ट्रकला येवून धडकली. अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. हा अपघात घडताच मोठा आवाज झाला. यामुळे मुतगा गावातील अनेक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात पांडुरंग बाबु बळी, गणेश पांडुरंग बळी, सीमा बळी, यांच्यासह रिक्षाचालक दशरथ पाटील गंभीर जखमी झाले आहेत. मारिहाळ पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.